अमरावती – अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत राणा दाम्पत्याला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. येथे काॅंग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी एकहाती सत्ता राखली आहे. विशेष म्हणजे रवी राणा यांचा भाऊ सुनील राणा सुद्धा पराभूत झाले आहे. रवी राणा यांच्या गटाला एकही जागा मिळाली नाही तर यशोमती ठाकूर यांच्या पॅनलचा सर्वच्या सर्व 18 जागांवर विजय झाला आहे.
बाजार समितीच्या निवडणुका म्हणजे हे पुढे येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा ग्रामीण भागात जनतेचा काय कल आहे याची चाचपणी समजली जाते. त्यामुळे या पराभवाचा राणा दाम्पत्याला येत्या निवडणुकीत मोठा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.
बाजार समितीच्या या निवडणुकीमध्ये रवी राणा हे संपूर्ण ताकदीनिशी उतरले होते. मात्र रवी राणा यांना त्यांच्या भावाला देखील निवडून आणता आले नाही. पराभवाचा राणा दाम्पत्यासह भाजपला या ठिकाणी मोठा धक्का बसला आहे. राणा यांच्या पॅनलचा पूर्णतः सुफडा साफ झाल्याने राणा यांनी जी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली ती कुठेतरी सामान्य मतदाराला आवडली नाही, असा देखील तर्क वितर्क काढला जात आहे.
यावेळी विजयानंतर यशोमती ठाकूर यांनी मोठा जल्लोष केला. गुलालाची उधळण करत विजयउत्सव साजरा केला आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना ठाकूर म्हणाल्या की, ‘हनुमान चालीसाचा गैरवापर करणाऱ्या राणा दाम्पत्याला शेतकऱ्यांनी धडा शिकवलाय, राणा दाम्पत्याने चांदीचे नाणे वाटले तर धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा विजय आहे.