पिंपरी – दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे या ठिकाणी तब्बल आठजण इच्छुक असून आम्ही ही निवडणूक लढविणार असल्याची ठाम भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईत मंगळवारी (दि. 31) झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईत उद्या (दि. 1) बैठक होत असून या बैठकीतच उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. जागेसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाकडून चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष ही निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. चिंचवडची पोटनिवडणूक महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाची समजली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसह इतर पक्षांचे स्थानिक पदाधिकारी तयारीला लागले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक लढविण्याबाबत ठराव करून राज्यपातळीवरील नेत्यांकडे पाठविला होता. त्यावर राज्य पातळीवर निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका पाहता ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच अजित पवारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केलेल्या घोषणेमुळे बिनविरोध निवडीची शक्यता मावळली आहे. अजित पवार म्हणाले, चिंचवडची पोटनिवडणूक लढविण्याबाबत आमचा पक्ष ठाम असून आमच्याकडे आठ इच्छुक उमेदवार आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी तातडीने चर्चा केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कमी वेळ राहिलेला असल्याने त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व आमदारांची उद्या मुंबईत बैठक होणार असून या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा केली जाणार आहे. तसेच स्थानिक पातळीवरील जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांशी चर्चा करून उमेदवार अंतिम केला जाईल. सध्या आघाडीत बिघाडीचे चित्र दिसून येत असले तरी राज्यपातळीवर याबाबत काय निर्णय होणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
पंढरपूर, देगलूर, कोल्हापूरबाबत भाजपचा वेगळा निर्णय का?
पंढरपूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर भाजपने त्या ठिकाणी प्रतिष्ठेची निवडणूक करून लढत दिली होती. तोच प्रकार कोल्हापूर आणि देगलूरबाबत करण्यात आला. मुंबईचा दाखल देऊन चिंचवड आणि कसब्याची निवडणूक बिनविरोध करण्याचे भावनिक आवाहन केले जात आहे. मग पंढरपूर, देगलूर आणि कोल्हापूरबाबत भाजपने वेगळा निर्णय का घेतला? असा प्रश्नही अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.