जयपूर – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ज्ञानवापी प्रकरण आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या निवासस्थानावर सीबीआयने टाकलेल्या छाप्यांवरून केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेस सेवादलाच्या एका कार्यक्रमात ते म्हणाले की, ज्ञानवापीबाबत नवा तमाशा सुरू झाला आहे. देशात अशी 100 ठिकाणे असतील जिथे ते वाद निर्माण करतील. किती दिवस ते हिंदू आणि मुस्लिमांना लढवत राहणार. शतकानुशतके एकत्र राहतात आणि शतकानुशतके एकत्र राहायचे आहे. देशाचे वातावरण बिघडवणाऱ्यांना सोडले जाणार नाही.
दुसरीकडे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ज्ञानवापी प्रकरणाबाबत सांगितले की, काही लोक लोकांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणाले, ‘ज्ञानवापी प्रकरण न्यायालयात आहे. त्यावर आताच काही बोलणे योग्य नाही. हे नवे मुद्दे समोर येत आहेत, ते देशासाठी चांगले नाही. हे आपल्या देशातील लोकशाही व्यवस्था बिघडवण्यासाठी आहे. परंतु सर्व मशिदी, मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळांमधील पूजेचा दर्जा कायम ठेवावा लागेल. या संदर्भात कायदाही करण्यात आला आहे.
दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला भारतीय जनता पक्षाचा प्रचार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक अशा घडामोडी घडवत आहे. एकतर भारतीय जनता पक्षच अशा घडामोडींमध्ये सक्रिय भूमिकेत आहे किंवा भाजपचे अदृश्य मित्र आहेत. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या भाजपचे ग्राउंड रिअॅलिटी आता समोर येऊ लागली आहे.