नवी दिल्ली – देशाच्या प्रगतीमध्ये दूरसंचार क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची असून 5 जी तंत्रज्ञानामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत 450 अब्ज डॉलर्सची भर पडेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. या दशकाच्या अखेरीला भारतात 6 जी सेवा सुरू होऊ शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायच्या रौप्य महोत्सवी समारंभाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 5 जी प्रणालीमुळे केवळ इंटरनेटचा वेग वाढणार नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेचाही वेग वाढेल. विकास आणि रोजगारालाही चालना मिळेल. या दशकाच्या अखेरीस, आम्ही 6 जी सेवा सुरू करू शकू, आमचा टास्क फोर्स त्यावर काम करत आहे. आमच्या प्रयत्नांमुळे आमच्या स्टार्टअप्सना दूरसंचार क्षेत्रात आणि 5 जी तंत्रज्ञानामध्ये जागतिक चॅम्पियन बनण्यास मदत होईल,असे ते म्हणाले.
आयआयटी मद्रासच्या नेतृत्वाखालील एकूण आठ संस्थांनी विकसित केलेल्या 5 जी टेस्ट बेडचा पंतप्रधान मोदींनी शुभारंभ केला.हे टेस्ट बेड हे दूरसंचार क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर देशाच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे असे ते म्हणाले. हे तंत्रज्ञान देशाच्या कारभारात, राहणीमानाच्या सुलभतेत आणि व्यवसाय करण्याच्या सुलभते मध्ये सकारात्मक बदल घडवून आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यामुळे कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिकसह प्रत्येक क्षेत्रातील वाढीला चालना मिळेल. यामुळे रोजगाराच्या अनेक संधीही निर्माण होतील असे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, 21व्या शतकातील कनेक्टिव्हिटी भारताच्या प्रगतीचा वेग ठरवेल. प्रत्येक स्तरावर कनेक्टिव्हिटीच्या आधुनिकीकरणावर त्यांनी भर दिला.पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आज देशातील प्रत्येक गाव ऑप्टिकल फायबरने जोडले जात आहे.
2014 पूर्वी, भारतातील 100 ग्रामपंचायती देखील ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटीने जोडलेल्या नव्हत्या. आज ब्रॉडबॅंड कनेक्टिव्हिटी सुमारे 2.5 लाख ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचली आहे. गरीब कुटुंबातील गरीबांना मोबाईल फोन उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही मोबाईलच्या निर्मितीवर भर दिला आहे. त्यामुळे देशातील मोबाईल उत्पादन करणाऱ्या संस्था 2 वरून 200 पेक्षा जास्त झाली, असे ते म्हणाले.