मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार पात्रता प्रकरणाचा निकाल उद्या म्हणजेच १५ फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देणार आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणीचे कामकाज पूर्ण झाले आहे. आता केवळ निकालाची प्रतीक्षा आहे.
शरद पवार गटाच्या वतीने अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर पक्षाच्या धोरणा विरोधात सरकारमध्ये सामील झाल्याचा ठपका ठेवत अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र याला अजित पवार गटाने जोरदार विरोध केला होता. २०१४ साली भाजपसोबत तर २०१९ साली शिवसेने सोबत, मग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेमके धोरण तरी कोणते?
असे कोणतेच धोरण ठरलेले नव्हते, त्यामुळे अपात्रतेची मागणी ही गैरलागू असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कोणता निर्णय घेतात? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
६ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला हाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याची मान्यता दिली आहे. तर शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे नाव देखील दिले होते. यावरून आता अजित पवार यांच्या बाजूनेच निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.