Naresh Mhaske : आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या पहिल्या भागातील कथा चुकीची होती. काही व्यक्तिमत्वांना मोठे करण्यासाठी चित्रपट काढण्यात आला होता, म्हणून उद्धव ठाकरे आणि आम्ही उठून निघून गेलो होतो. त्याच प्रमाणे धर्मवीर २ मध्ये देखील असाच चुकीचा प्रकार असणार असून त्याची कथा देखील चुकीची असणार, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांना आता शिवसेना राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यासोबतच त्यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
संजय राऊत यांनी आनंद दिघेंची मुलाखत एका मासिकात छापली होती आणि त्यामुळेच दिघे यांना टाडा लागला होता, असा आरोप शिवसेना राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी केला आहे. राऊत आणि मातोश्रीने दिघेंचा नेहमीच दुस्वास केला, असा आरोपही त्यांनी केला.धर्मवीरच्या पहिल्या भागात काही बंधने होती. त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांना राऊत आणि मंडळी कसा त्रास देत होती, कसे खच्चीकरण करायचे हे दाखवले नव्हते. दिघे यांच्यासोबत नेमके काय झाले होते हे दुसऱ्या भागात आपल्याला कळेलच, असे म्हस्के यांनी सांगितले.
आनंद दिघे यांचे निधन झाल्यानंतर पहिला प्रश्न विचारला गेला, तो म्हणजे, “त्यांची संपत्ती कुठे कुठे आहे, त्या सर्व गोष्टी लोकांसमोर येतील. संजय राऊत आणि मातोश्रीने दिघे यांचा जो दुस्वास केला, तो पहिल्या भागात दाखवता आला नाही. त्यांची इच्छा असावी, या सर्व गोष्टी पुन्हा दाखवाव्यात. त्यामुळे ते अशा पद्धतीने वक्तव्य करत आहे”, असा टोलाही त्यांनी संजय राऊतांना लगावला.
त्यासोबतच उद्धव ठाकरे आणि उरलेली शिवसेना संपवण्याची सुपारी राऊत यांनी शरद पवार यांच्याकडून घेतली असल्याचा आरोपही म्हस्के यांनी केला. धर्मवीर आनंद दिघे आम्ही जगतो, दिघे यांचे आत्मचरित्र लोकांसमोर आणणे हा राजकीय स्वार्थ नसून सामाजिक स्वार्थ असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.