Sanjay Raut – राज्यात गेल्या कित्येक दिवसापासून ठाकरे गट व शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. विधानसभा राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर सुनावणीचा वेग वाढवला आहे. दोन्ही बाजूंच्या आमदारांविरोधात अपात्रतेची नोटीस दाखल झाली असून त्यासंदर्भात अध्यक्षांसमोर सध्या सुनावणी चालू आहे. अशात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी रविवारी केलेल्या एका विधानाच्या उत्तरादाखल बोलताना संजय राऊतांनी नार्वेकरांना लक्ष्य केलं आहे. “तुम्ही बेकायदा सरकारचे रक्षक आहात”, असं संजय राऊत म्हणाले.
राहुल नार्वेकरांना आमदार अपात्रता सुनावणीसंदर्भात माध्यमांनी विचारणा केली असता म्हणाले, ‘सरकार पडायचे असेल तर ते सभागृहातील संख्याबळावर पडत असते. सभागृहात अविश्वास ठराव झाल्यानंतर संख्याबळ कमी असल्यास ते सरकार पडते. बाहेर कोण बोलतोय म्हणून सरकार पडत नसते. या सरकारने बहुमताचा जादुई आकडा सभागृहात पार केला आहे आणि तेवढी संख्या केली आहे. उगाचच कोणीतरी असंवैधानिकपणे सरकार पडणार पडणार अशी भाषा वापरू नये, असेही त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तसेच आमदार अपात्रतेबाबत वेळेतच निर्णय होणार आहे. सुप्रीम कोर्टाने जो टाईम बाँड दिला आहे. त्यानुसार वेळेत निर्णय द्यायचा माझा विचार आहे. पण कोणत्याही नैसर्गिक न्याय तत्त्वाला धक्का पोहचणार नाही. विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान राहुल नार्वेकरांच्या या विधानावर आता राऊतांनी माध्यमांशी बोलतांना टीका केलीआहे. संजय राऊत म्हणाले,’हे सरकार कधीच पडलं असतं. तुम्ही बेकायदा सरकारचे संरक्षक आहात. विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने ‘राजकीय गप्पा कमी करा’ असे निर्देश दिले आहेत. तुम्ही संवैधानिक आणि निष्पक्ष पदावर बसले आहात. तिथे बसून तु्म्ही बेकायदा सरकारची वकिली करू शकत नाहीत. ज्यांनी १० वेळा स्वार्थासाठी पक्ष बदललाय, त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा ठेवू शकतो? जर तिथे कुणी संविधान मानणारी व्यक्ती बसली असती, तर आत्तापर्यंत हे सरकार कोसळलं असतं. सरकार कधी जाणार हे तुम्ही आम्हाला सांगू नका. आम्हाला माहिती आहे हे सरकार कधी जाणार’ असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे.