नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी सर्वप्रथम मंत्रिपदाची शपथ घेण्याचा मान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मिळाला. शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून सुरू झालेला राणेंचा त्या पक्षातील राजकीय प्रवास मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचला.
त्यानंतर कॉंग्रेसमध्ये डेरेदाखल झालेल्या राणेंनी त्या पक्षाला रामराम ठोकून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. तो पक्ष ऑक्टोबर 2019 मध्ये भाजपमध्ये विलीन झाला. आता भाजपने केंद्रीय मंत्री बनवून त्यांचे राजकीय वजन आणखी वाढवले आहे.
महाराष्ट्राला चार मंत्रिपदे
प्रकाश जावडेकर आणि संजय धोत्रे या महाराष्ट्रातील दोन नेत्यांना केंद्रीय मंत्रिपदे गमवावी लागली. त्याचवेळी नारायण राणे, डॉ.भागवत कराड, डॉ.भारती पवार आणि कपिल पाटील यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या वाट्याला चार मंत्रिपदे आली. कराड हे राज्यसभेचे खासदार आहेत.
पवार या लोकसभेत नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तर, पाटील हे भिवंडीचे खासदार आहेत. चार मंत्रिपदे मिळाल्याने केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राला झुकते माप मिळाल्याचे चित्र आहे.