नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्या राजीनाम्यावरून कॉंग्रेसने मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. वर्धन यांच्या राजीनाम्यातून सरकारने करोना संकट हाताळणीतील प्रचंड अपयशाची स्पष्ट कबुलीच दिली, असे कॉंग्रेसने म्हटले.
करोना संकट हाताळणीतील गैरव्यवस्थापनाला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जबाबदार आहे. त्या प्राधिकरणाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. अपयशाची जबाबदारी मोदी स्वीकारणार का की केवळ वर्धन यांना बळीचा बकरा बनवणार, असा बोचरा सवाल कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी ट्विटरवरून केला.
सर्व काही चांगले झाल्यास मोदी श्रेय घेणार. मात्र, उलट घडल्यास संबंधित मंत्र्याला जबाबदार धरले जाणार, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी दिली.
पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीही नामोल्लेख टाळून मोदींवर निशाणा साधला. सर्वोच्च स्तरावरील अपयशांसाठी वर्धन यांना बळीचा बकरा बनवण्यात आले, असे ते म्हणाले.