Narayan Rane : संसदेत घुसखोरी प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, बेरोजगारी आणि महागाई या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी या तरुणांनी हे कृत्य केले.असल्याचे म्हटले होते. त्याप्रमाणे आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील देशातील तरुण बेरोजगार असल्याने हा प्रकार घडला असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या याच वक्तव्यावर नारायण राणे प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण राणे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना,“राहुल गांधी यांच्याकडे आता बोलण्यासाठी कोणताही विषय नाही. बेरोजगार आहे म्हणून आता सर्वांनी लोकसभेत येऊन उड्या मारायच्या का? लोकशाहीत आपले म्हणणे मांडण्याचे इतरही पर्याय आहेत. आपले प्रश्न मांडण्यासाठी इतरही विधायक मार्ग आहेत. त्याचा अवलंब न करता थेट लोकसभेत येऊन उड्या मारणे योग्य नाही.” असे म्हणत आपली प्रतिक्रिया दिली.
पुढे नारायण राणे यांनी,”काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा यात्रा काढली तरी त्यांना काहीही फायदा होणार नाही. याआधी त्यांनी भारतभर यात्रा काढली. मात्र नुकत्याच पाच राज्यात झालेल्या निवडणुकीपैकी तीन राज्यात आम्ही मोठा विजय मिळविला.” आता लोकसभेची निवडणूक येत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅटट्रिक मारतील. यावेळी भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळतील, असा दावादेखील नारायण राणे यांनी केला.
दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणात राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी आदित्य असे काही करेल, असे वाटत नसल्याचे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे, शर्मिला ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर मी काही बोलणार नाही. एसआयटी त्यांचा तपास करेल. पण जर कुणाला वाटत असेल की, आदित्य ठाकरेने काहीच केलेले नाही. तर त्यांनी तसे पुरावे सादर करावेत.” असे त्यांनी म्हटले.