मुंबई – माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कालच्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर जोरदार प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवले आहे, मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीने जी भाषा वापरणे अपेक्षित असते त्याचा त्यांच्या कालच्या भाषणात अभाव दिसला. हा माणूस मुख्यमंत्रिपदाच्या लायकीचा नाही अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
राणे म्हणाले की आमचा उल्लेख काल त्यांनी बेडुक असा केला, पण आम्ही वाघच आहोत म्हणूनच आम्ही शिवसेनेला सत्तेवर आणू शकलो असे ते म्हणाले. आपण काय बोलतोय हे त्यांना कळत नाही. पंतप्रधानांवर काही बोलण्याची त्यांची लायकी नाही. त्यांनी कालच्या भाषणात राज्यातील एकाही विकास कामाचा उल्लेख केला नाही. हिंदुत्वावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. यांचे 56 आमदार मोदींच्या नावावर आले आहेत. अन्यथा त्यांचे 25 आमदारही आले नसते. हिंदुत्वाला मूठमाती देऊन त्यांनीपद मिळवले असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी स्वताच्या मुलाला क्लीन चीट दिली आहे. पण आम्ही अजूनही म्हणतो आहे की, सुशांतसिंह याचा खूनच झाला आहे. यातील आरोपी गजाआड जातील. यात एक मंत्री आणि त्याचा एक मुलगाही असेल असा आरोपही त्यांनी केला. सीबीआयने अजून ही केस बंद केलेली नाही याचा दाखलाही त्यांनी दिला.उद्धव ठाकरे यांनी स्वताच्या जीवावर एकही काम केलेले नाही. आपण वाघ असल्याचा दावा ते करतात पण ते पिंजऱ्यातील वाघ आहेत, अशी टिपण्णीही राणे यांनी केली.
यापुढे आमच्यावर बोललात तर मी 39 वर्षात जे पाहिलं ते सगळं बाहेर काढेन असा इशाराही राणे यांनी यावेळी ठाकरे यांना दिला. हा माणूस मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही. मराठ्यांचा द्वेष करणारा हा माणूस आहे, असा दावाही राणे यांनी केला.