पाटणा – नितीशकुमार यांच्या सात निश्चय योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून आम्ही सत्तेवर आल्यानंतर या भ्रष्टाचाराची चौकशी करून नितीशकुमारांसह जे कोणी दोषी ठरतील त्यांना आम्ही तुरूंगात पाठवू असे लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी म्हटले आहे.
राज्यात दारूबंदी लागू करून दारूच्या स्मगलिंगला नितीशकुमार यांनीच उत्तेजन दिल्याचा आरोप चिराग पासवान यांनी केला.मुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली राज्यात राजरोस भ्रष्टाचार सुरू आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. नितीशकुमार हे मुख्यमंत्री होते म्हणून त्यांना सोडले जाणार नाही त्यांच्या सरकारचा भ्रष्टाचार उघड झाला तर त्यांनाहीं आम्ही तुरूंगात पाठवू असे चिराग पासवान यांनी आज येथे पीटीआयशी बोलताना सांगितले.
तत्पुर्वी पाटणा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, नितीशकुमार यांच्या सात निश्चय योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याची बाब 12 कोटी बिहारी जनतेला आणि प्रसार माध्यमांनाही कळली आहे. राज्यात त्यांच्याच आशिर्वादाने दारू माफिया तयार झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला. बेकायदा दारू धंद्यातील काळापैसा थेट राज्यकर्त्यांच्याच खिशात जात आहे आणि त्यासाठीच बिहार मध्ये दारू बंदी लागू करण्यात आली आहे असेही त्यांनी नमूद केले.