औंध – छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करणे फार सोपे आहे परंतु त्यांचे विचार आचरणात म्हणून एक पाऊल जरी चालता आले तरी ते फार महत्त्वाचे आहे. जय भवानी जय शिवाजी बोलणे फार सोपे आहे. सगळ्या धर्माच्या व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य स्थापन केले आहे.
प्रत्येकाला आपल्या मध्ये सामावून घेण्याची जी ताकत त्यांच्या मध्ये जी वृत्ती होती त्यामुळे त्यांनी सर्वांना समान न्याय दिला व भरभरून दिले. महाराजांनी कधीही जातीभेद केला नाही त्याप्रमाणेच आपण ज्या दिवशी माणसाला माणूस म्हणून एकमेकाला ओळखायला लागू त्यादिवशी खऱ्या अर्थाने या शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा सन्मान केला असे वाटेल असे ज्येष्ठ कलाकार नाना पाटेकर म्हणाले. स्वराज्य प्रतिष्ठान बाणेर च्या माध्यमातून व नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अनावरण प्रसंगी ज्येष्ठ कलाकार नाना पाटेकर बोलत होते
पुढे बोलताना नाना पाटेकर म्हणाले की सर्वांना समान न्याय देऊन सामावून घेण्याची जी महाराजांची शिकवण आहे त्यामुळे समाज समृद्ध होईल. इतिहासाच्या नावाखाली विकृतीचे रंग पेरू नका. काही थोड्या लोकांमुळे ही विकृती पसरले जात आहे. कुठलाही धर्म हा दुसऱ्याच्या धर्माच्या द्वेषाच्या आधारित नसावा. मी हिंदु आहे जन्मलो हिंदू व मरणार देखील हिंदू परंतु मला दुसऱ्या धर्माबद्दल आदर आहे व तो कायमस्वरूपी राहणार आणि तो असायलाच पाहिजे. यावेळी बाणेर येथे स्वराज प्रतिष्ठान च्या माध्यमातून व नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या स्मारकाचे त्यांनी कौतुक केले तसेच या ठिकाणी नुसते स्मारक न उभारता स्मारकाच्या माध्यमातून वाचकांसाठी लायब्ररी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याबद्दल त्यांनी स्वराज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रल्हाद सायकर यांचे कौतुक केले.
प्रस्तावना मध्ये स्वराज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रल्हाद सायकर म्हणाले की 1 वर्षापूर्वी या ठिकाणी या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते चार ते सहा महिन्यांमध्ये हे स्मारक उभे करण्याचे ठरवले होते परंतु कोरोना विषाणूचा साथीमुळे या स्मारकाच्या अनावरण करण्यास उशीर झाला परंतु हे जे सुंदर असे भव्य स्मारक माझ्या माध्यमातून उभारण्यात आले आहे त्याचा मला अभिमान आहे. या स्मारकास कोणत्याही प्रकारचा शासकीय निधी उपलब्ध झाला नाही. मी सर्वांना आवाहन केले होते त्या माध्यमातून स्मारकासाठी 64 लाख रुपये जमा झाले. या स्मारकामधून फक्त शिवाजी महाराजांची प्रेरणाच मिळणार नसून या ठिकाणी महाराजांचे विचार समजण्यासाठी वाचनालय देखील करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी ज्या सर्वांनी स्मारकासाठी मदत केली त्यांचे अभिनंदन केले.
बाणेर येथील शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा अनावरण समारंभ शुक्रवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी ज्येष्ठ कलाकार नाना पाटेकर व भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्मारकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, हे प्रमुख उपस्थितीत हा अनावरण सोहळा संपन्न झाला.
आपण ज्या दिवशी माणसाला माणूस म्हणून एकमेकाला ओळखायला लागू त्यादिवशी खऱ्या अर्थाने या शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा सन्मान केला असे वाटेल.
– नाना पाटेकर