Nana Patekar : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिली आहे. त्यामुळे मुंबईत येत्या 20 जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून लोकांनी मुंबईला पायी प्रवासाची तयारी करावी, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी निर्णायक लढा पुकारला असून, अंतरवाली सराटीतून पायी मुंबईकडे प्रस्थान कसे करायचे याबद्दल सविस्तर माहिती काही दिवसांपूर्वीच जरांगे यांनी दिली.
20 जानेवारीला सकाळी 9 अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे प्रस्थान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्यांनी या पायी मोर्चात सहभागी व्हायचं आहे. असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.
दरम्यान, या आरक्षणाच्या मुद्द्यावर आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. आरक्षणाबाबत माझी मतं फार पराकोटीची आहेत, असं ते म्हणाले आहेत. माध्यमांशी नाना पाटेकर यांना ‘आरक्षणाविषयी तुमचं काय मत आहे? असा प्रश्न विचारल्यावर नाना म्हणाले,
‘मला माहीत नाही. आरक्षणासंदर्भात मी टिप्पणी करू नये. आरक्षणाबाबत माझी मतं फार पराकोटीची आहेत. मी काही बोललो तर पुन्हा उद्या त्यावरून बोंबाबोंब होईल. असं नाना यावेळी म्हणाले. यावेळी नानांनी राजकारणात प्रवेश करणार का?
या प्रश्नाचंही उत्तर दिलं… ‘आपण राजकारणाविषयी याठिकाणी बोलू नये, ते एवढ्यासाठी की मग मी फार परखडपणे बोलेन. त्यावरून पुन्हा कॉन्ट्रोव्हर्सी होईल. मी कुठल्याही पक्षाचा नाही. माझे वडील कट्टर काँग्रेसवादी होते, मी कट्टर शिवसेनेचा होतो. आज मला भाजप खूप छान काहीतरी करेल अशी खात्री वाटते.
मला नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा आमचे देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काम करतात, ते मला आवडतं. ज्या पद्धतीने नितीन गडकरी काम करतात, ते मला आवडतं. कोण काय बोलेल याच्याशी काही घेणंदेणं नसतं. आपल्याला आपलं काम अतिशय इमानानं करता आलं पाहिजे’. असं नाना पाटेकर यावेळी म्हणाले.