Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर यांनी हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. त्यांच्या उत्तम अभिनयामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे ते खास करून ओळखले जातात. 8 डिसेंबर रोजी नाना पाटेकर यांनी तिरुंवनंतपुरम येथील केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती. केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं हे 28 वं वर्ष आहे. आयएफएफकेच्या उद्धाटनादरम्यान केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान नाना पाटेकर यांनी त्यांच्या मनातील एक खंत व्यक्त केली.
मल्याळम सिनेसृष्टीबद्दल बोलताना नाना म्हणाले,”गेल्या 50 वर्षांत केरळमधील एकाही दिग्दर्शकाने मला सिनेमासाठी संपर्क केलेला नाही. अद्याप मला मल्याळम मनोरंजनसृष्टीत काम करण्याची एकही संधी मिळालेली नाही. याचा अर्थ अभिनेता म्हणून माझ्यात सुधारणा होणं गरजेचं आहे.” यावेळी त्यांनी आयोजकांचे आभार मानले.
“केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला मला आमंत्रित केल्याबद्दल आणि माझा सन्मान केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. एका सिनेमाच्या शूटिंगसाठी 32 वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा केरळला आलो होतो. केरळच्या सामाजिक-राजकारण परस्थितीत काहीही बदललेलं नाही. केरळसारखे लोक सर्वत्र असले पाहिजे,” असेही नाना पाटेकर म्हणाले.
दरम्यान, नाना पाटेकर यांचा ‘द व्हॅक्सीन वॉर’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा अयशस्वी ठरला. याशिवाय काही दिवसानपूर्वीच नाना पाटेकर यांचा एक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात एका चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना सेटवर एक चाहता नानांबरोबर सेल्फी घेण्यासाठी पुढं गेला, यावेळी नाना पाटेकर यांनी त्याला टपलीत मारली.
तसंच त्याला सेटवरून बाहेर काढण्यात आलं. हा व्हिडीओ पाहून नाना पाटेकर यांचे चाहते आणि नेटकरी त्यांच्यावर नाराज झाले होते. यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ झाली. त्यानंतर त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून या घटनेची नेमकी माहिती सांगत चाहत्यांची माफी मागितली.