Ram Mandir : भारताच्या इतिहासामध्ये 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील (Ayodhya) त्यांच्या भव्य राम मंदिरात (Ram Mandir) निवास करतील. अयोध्येत आता श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत.
अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. 15 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. संपूर्ण देशासाठी हा एक मोठा क्षण असेल.
अयोध्येतील राम मंदिरासाठी बरीच वर्ष कारसेवकांनी लढा दिला. आंदोलन झाली. सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला. राम मंदिर उद्घाटनाचा एक भव्य सोहळा रंगणार आहे. मात्र, दुसरीकडे राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरुनही मोठ्या प्रमाणात राजकारण होताना दिसत आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहे.
या सगळ्यामध्ये राम मंदिर आंदोलनात दिवंगत हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचही मोठ योगदान आहे. 90 च्या दशकात राम मंदिर आंदोलनाचा मुद्दा तापला होता. त्यावेळी बाळासाहेबांनीच ‘गर्व से कहो हम हिंदू है…’ ही घोषणा राजकीय मंचावरुन दिली होती. बाळासाहेबांनी सर्व आंदोलक कार सेवकांचा समर्थन केलं होतं. यावेळी त्यांनी राम मंदिर अयोध्येतच होणार, हा मुद्दा प्रखरपणे मांडला होता.
बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच निमंत्रण नसल्याच्या मुद्यावरुन आरोप-प्रत्यारोप झाले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे यांच्या पक्षाने एक मोठी मागणी केलीय. मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलय. मनसेचे उपाधक्ष सतीश नारकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलय.
त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव अयोध्येतील प्रमुख चौकाला देण्याची मागणी केली आहे. 22 जानेवारीला श्रीरामांची अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना आहे. 23 जानेवरीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे’. त्यामुळे या दिवशी त्यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्याची मागणी केली आहे.