25 ऑक्टोबरपासून वाटपाचे आदेश; शिधाजिन्नसांचा पुरवठा नाही; मैदा, पोहे वाढल्याने चनाडाळ, रवा झाला अर्धा किलो
नगर – गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीसाठी शासनाकडून “आनंदाचा शिधा’ देण्यात येणार आहे. परंतू दिवाळी आता बारा दिवसांवर आली तरी अद्यापही शिधापत्रिकानुसार शिधाजिन्नसांचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी, अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वेळेत मिळेल का, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्या यंदा आनंदाचा शिधा मध्ये सहा वस्तू देण्यात येणार आहेत. मैदा व पोहे हे या दोन वस्तू वाढविल्याने त्यांचा परिणाम म्हणुन की काय रवा व चनाडाळ एक किलोऐवजी अर्धा किलोच देण्यात येणार आहे.
जिल्ह्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने 47 लाख 19 हजार 113 शिधापत्रिकानुसार शिधा संचाची मागणी नोंदवली. त्यापैकी आतापर्यंत 15 लाख 44 हजार 39 संच प्राप्त झाले आहेत. हे प्रमाण 32.72 आहे. हे संच तालुका पातळीवरील गोदामात येऊन पडले आहेत. परंतु जिल्ह्यात सर्वच तालुक्यांना पूर्णपणे शिधाजिन्नसांचा पुरवठा झाला नाही. जे आहे तर ते नाही अशी गत झाली आहे. संगमनेर तालुक्यात अद्याप 5 पैकी एकही शिधाजीन्नस प्राप्त झालेले नाहीत. जामखेडमध्ये केवळ साखर प्राप्त झाली आहे, इतर पाच शिधाजीन्नस मिळालेले नाहीत. बहुसंख्य तालुक्यात मैदा व पोहे प्राप्त झालेले नाहीत. याशिवाय नगर शहर, कर्जत व कोपरगाव तालुक्यात चणाडाळ पोहोच झालेली नाही. त्यामुळे पूर्णपणे आनंदाचा शिधा कसा वाटप करावा असा प्रश्न असल्याने सध्या तरी आनंदाचा शिधाचे वाटप जिल्ह्यात कोठेही सुरू झालेले नाही.
यंदाच्या दिवाळीसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतमार्फत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांसाठी आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.दि. 25 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ‘ई-पॉस’ प्रणालीद्वारे प्रत्येकी 100 रुपये सवलतीच्या दरात वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदा या आनंदाच्या शिधांमध्ये मैदा व पोहे हे दोन शिधाजीन्नस समाविष्ट करण्यात आले. मात्र साखर एक किलो, खाद्यतेल एक लिटर हे प्रमाण कायम ठेवले असले तरी रवा, चना डाळ, मैदा व पोहे यांचे प्रमाण एक किलो ऐवजी अर्धा किलो करण्यात आले आहे. दिवाळी सणातील गोडधोड करण्यासाठी एका कुटुंबाला हे प्रमाण पुरेसे नसल्याची भावना आहे.
ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेची अडचण
जिल्ह्यात 194 ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने निवडणूक आचारसंहिता आहे. या आचारसंहितेमुळे पंतप्रधान, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांचे फोटो आंनदाचा शिधाच्या पिशवीवर छापता येता की नाही. त्यामुळे या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे 6 नोव्हेंबरला निकाल जाहीर झाल्यानंतर नेत्यांचे फोटो पिवशीवर छापून मगच आंनदाचा शिधा वितरित होणार असल्याचे दिसत आहे.