नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे ४ तालुक्यातील २४ गावातील ८९८ शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यात नगर, पाथर्डी, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील गावांचा यात समावेश असून यात ८९८ शेतकर्यांच्या ४८२ हेक्टरवरील पिकांना दणका बसला आहे तर पावसामुळे २० जनावरांच्या गोठ्यासह १९ घरांचे अंशत: तर ७ घरांचे पूर्ण असे २६ घरांचे नुकसान झालेले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
जिल्ह्यात सध्या वाढत्या उन्हामुळे टंचाईच्या झळा सोसत असणार्या नागरिकांना आता अवकाळीमुळे दुहेरी फटका बसला आहे. जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या आकडेवारीनूसार जिल्ह्यात १७ तारखेला झालेल्या वादळी पाऊस यामुळे नगर तालुक्यातील १० गावे, पाथर्डीच्या ५ गावात, कर्जतच्या ६ गावात आणि जामखेडच्या ३ गावात पिकांचे नुकसान झालेले आहे.
यात २०७ हेक्टवरील ३३२ शेतकर्यांचे झालेले नुकसान हे ३३ टक्क्यांच्या आत आहे. तर २७६ हेक्टवरील ५६६ शेतकर्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. जिल्ह्यात वादळी पावसामुळे २४ गावातील ८९८ शेतकर्यांचे पिकांचे नुकसान झालेले आहे. शेती पिकांचे नुकसान झालेल्यामध्ये कांदा, संत्रा, आंबा, डाळींब, उन्हाळी बाजरी, लिंबू, चिक्कू, चेरी, चारापिके, मिरची, टोमॅटो, केळी, मका या पिकांचा समावेश असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान हे नगर तालुक्यातील ७४५ शेतकर्यांचे झालेले असून त्यांच्या ३९६ हेक्टवरील शेती उजाड झाली आहे. यासह पाथर्डीतील ३० शेतकर्यांची १४ हेक्टर, कर्जतच्या ११५ शेतकर्यांचे ७० हेक्टर तर जामखेडच्या ८ शेतकर्यांच्या २.९ हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा दणका बसलेला आहे.
६ जनावरांचा मृत्यू
अवकाळी पावसामुळे २० जनावरांच्या गोठ्यासह १९ घरांचे अंशत: तर ७ घरांचे पूर्ण असे २६ घरांचे नुकसान झालेले आहे. यासह ५ मोठ्या जनावरांसह १ लहान जनावर वादळात मृत्यूमुखी पडलेले आहेत. जामखेड तालुक्यात 3 आणि पारनेर तालुक्यात २ मोठ्या तर जामखेड तालुक्यात १ लहान जनावराचा यात समावेश आहे.
यासह अकोले तालुक्यात ७, पारनेर तालुक्यात ९ आणि पाथर्डी तालुक्यात अशा १९ घरांचे अंशत: तर नगर तालुक्यातील ७ घरांचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे. यासह नगर तालुक्यात २० जनावरांच्या गोठ्याची पडझड झालेली आहे.