शेरखान शेख
शिक्रापूर – शिरुर तालुक्यातील अनेक गावांसह वाड्या वस्त्यांना उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना नागरिकांच्या मागणीनुसार शासनाकडून काही गावांना सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. काही गावे आज देखील टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.
शिरुर तालुका चासकमानमुळे सुजलाम सुफलाम झाला असल्याचे बोलले जात असताना आज देखील कान्हर मेसाई, पाबळ, केंदूर, मिडगुलवाडी, धामारी, डफळापूर, खैरेनगर, वरुडे, खैरेवाडी, मोराची चिंचोली, हिवरे, शास्ताबाद यांसह अन्य गावांना उन्हाळ्यात दुष्काळ जाणवत आहे. आजही कायम ही भीषणता आहे. या गावांनी पाण्यासाठी अनेक आंदोलने केली आहेत, सध्या या गावातील काही ग्रामपंचायतीच्या वतीने शिरुर पंचायत समितीकडे गावामध्ये पाण्याचे टँकर सुरु करण्याची मागणी केली आहे.
अखेर पाबळमध्ये दिवसाला सहा टँकरद्वारे २६ खेपा तर केंदूरमध्ये दिवसाला चार टँकरद्वारे १२ खेपा आणि धामारी गावठाणसाठी एका टँकरद्वारे ४ खेपा पाणी वाटप सुरु केले आहे. कान्हूर मेसाई गावासाठी देखील सध्या पंचायत समितीकडे पाण्याचे टँकर सुरु करण्याची मागणी केल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी सांगितले आहे. मात्र, प्रत्येक वर्षी नागरिकांचा पाण्याचा संघर्ष थांबणे काळाची गरज निर्माण झाली आहे, शिरुर तालुक्यातील ज्या गावांमध्ये प्रत्येक वर्षी पाण्याची समस्या निर्माण होते. त्या गावांमध्ये शासनाकडून पाण्याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे.
याबाबत ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली नाही. पाण्याच्या समस्येमुळे प्रत्येक वर्षी येथील नागरिकांना व शेतकऱ्यांना जनावरांचा चारा पुरविणे देखील जिकीरीचे होऊन शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेला दुग्ध व्यवसाय सुद्धा अडचणीत आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी शिरुर तालुक्यातील बारा गावांनी पाण्यासाठी केलेल्या संघर्षाला अद्याप यश आलेले नाही. शिरुर तालुका टँकरमुक्त होणार की नाही असा देखील प्रश्न नागरिकांना पडला आहे.
प्रस्ताव आल्यास कार्यवाही करू
शिरुर तालुक्यातील पाबळ व केंदूर गावांच्या वाड्या वस्त्या साठी ग्रामपंचायत ने दिलेल्या प्रस्तावाद्वारे पाबळ साठी सहा टँकर तर केंदूरसाठी चार टँकरला मंजुरी देण्यात आली असून पुढील काही गावांचे मागणी प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे–देवकाते यांनी सांगितले.
पाणीबचतीची गरज- दळवी
सध्या उन्हाची तीव्रता जास्त असल्याने पाणीपातळी घटली व विहिरी कोरड्या पडल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसाठी शासनाने तत्काळ चारा छावणी सुरू करावी तसेच ज्या भागात पाण्याचे टँकर सुरु झाले. तेथील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शहाजी दळवी यांनी सांगितले.
वनविभागात पाणवठ्यांत पाणी सोडले
शिरुर तालुक्यातील काही भागांमध्ये नागरिकांना पाण्याचा सामना करावा लागत असताना सध्या पशु पक्षांच्या देखील पाण्याची समस्या निर्माण झालेली असल्याने शिरुर वनविभागाच्या वतीने देखील काही भागात कृत्रिम पाणवठ्यांना टँकरद्वारे पाणी सोडले जात असल्याचे शिरुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी सांगितले.