औरंगाबाद : मध्यप्रदेशात जाण्यासाठी जालन्यातील स्टील उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना मालवाहतूक रेल्वेने चिरडल्याची घटना आज पहाटे घडली. दरम्यान, या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण बचावले आहे. यातील बचावलेल्या मजुराने आम्ही झोपेत असताना माझ्या सहकाऱ्यांना रेल्वेने कधी चिरडलं समजलंच नाही असे मजुराने या घटनेची आपबिती सांगितली आहे.
सर्व मजूर मध्यप्रदेश येथील असून, ते जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते. दुर्घटनेतून बचाव झालेल्या मजुराने सांगितले, चालून चालून आम्ही थकलो होतो. पाणी प्यायलो आणि म्हटलं थोडा वेळ आराम करावा. त्याचदरम्यान रेल्वे रुळावर असतानाच थोडी धुंदी आली आणि डोळा लागला. त्यानंतर समोरून कधी ट्रेन आली ते समजलंच नाही आणि माझ्या सहकाऱ्यांना चिरडून टाकलं. ट्रेन आल्याचं आम्हाला कोणालाही समजलं नाही. आमचा डोळा लागला होता. आम्ही सर्व १९ मजूर होतो. सर्व मजूर मध्यप्रदेशातीलच होते. पण वेगवेगळ्या जिल्ह्यातील होते, असंही त्यानं सांगितलं आहे.
आम्ही काका आणि पुतणे या अपघातातून वाचलो आहोत. माझ्या पुतण्याचं वय १९ वर्षं असून, माझं वय २१ वर्षं आहे. आम्ही जानेवारीमध्ये येथे आलो होतो. आई, बायको आणि दोन छोटी छोटी मुलं घरी एकटीच आहेत, म्हणून तिकडे जायचं होतं. औरंगाबादवरून बस किंवा ट्रक मिळेल, या उद्देशानं आम्ही आलो होतो. काल संध्याकाळी ४ ते ५ दरम्यान आम्ही तिकडून निघालो होतो. काही ठिकाणी थांबून एक एक चपाती खाल्ली होती आणि इतर चपात्या पुढच्या प्रवासासाठी ठेवल्या होत्या. परंतु काळानंच आमच्यावर घाला घातला, अशा भावनाही त्या मजुरानं व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली असून शोक व्यक्त केला आहे. तसंच रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती दिली आहे.