भाटघर – भाटघर परिसरात परिसरात यावर्षी आंब्याच्या झाडाला फळ कमी प्रमाणात आहे. दोन महिन्यापूर्वी ऊन-सावल्यांचा खेळ चालू होता, त्यामुळे मोहोर काळसर पडून गळाला होता. तसेच चार ते पाच दिवसांपूर्वी वादळी पाऊस झाल्याने याचा फटका आंबा पिकाला बसला आहे. यामुळे यावर्षी आंब्याचे प्रमाण कमी आहे. उरलेसुरले आंबा पीक शेतकरी वर्ग पदरात पाडण्याच्या तयारीत असला तरी लॉकडाऊन वाढल्यास आंबा विक्रीचा फार मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. लॉकडाऊन उघडले तरी करोनाच्या भीतीपोटी वाहतुकीची वर्दळ कमी असणार आहे. यामुळे फूटपाथवरील किरकोळ विक्रेत्यांच्या पदरी निराशाच आहे.
दरवर्षी रोजंदारीवर काम करणारे मुजरही आंबा खरेदी करत असतात; परंतु यावर्षी त्यांचीच आर्थिक अवस्था बिकट असल्याने आंबा खरेदी करण्याची ऐपत नाही. यामुळे आंबा विक्रेत्यांवर आर्थिक संकट उभे राहणार आहे. आंब्याची विक्री कशी करावी, असा गहन प्रश्न शेतकरीवर्गासमोर उभा राहिला आहे. याबरोबरच तालुक्यातील सर्व बाजारपेठाही बंद असल्याने बाहेरही आंबा पाठवणे अशक्य आहे.
याबरोबरच उन्हाळी भुईमूग पीक काढणीला आले असले तरी लॉकडाऊनमुळे पुणे येथील मार्केट बंद असल्याने शेतकरी वर्ग अडचणीत पडला आहे. उन्हाळा हंगामातील धनलक्ष्मी जातीचा भुईमूग शेंग वाळवूण साठवणूक केली असता दोन महिन्यातच शेंगाला बुरशी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे भुईमूग शेंगाची साठवणूक करणे अवघड झाले आहे. टोमॅटो, वांगी, गवार, भेंडी या पिकांची गावातच किरकोळ विक्री केली जात आहे.
फुलशेती लॉकआऊटच्या प्रतीक्षेत
भाटघर परिसरात काही शेतकरी फुलांचे उत्पादन करतात. शेतामध्ये फुले उमलेली आहेत; पण लॉकडाऊनमुळे फुल मार्केट बंद असल्याने व किरकोळ विक्रीही बंद असल्याने शेतामधील फुले आहे या स्थितीत डुलताना दिसत आहेत. फुलांना मार्केट नसल्याने शेतकऱ्यांनी फुलांची तोड केली नाही.