क्षमता असूनही तपासणीसाठी पाठवितात कमी स्वॅब
पिंपरी – करोना संशयित रुग्णांचा तपासणी अहवाल येण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत आहे. यामुळे करोना संशयितांमध्ये अहवाल येईपर्यंत भितीचे वातावरण निर्माण होते. याचाच फायदा घेत खासगी लॅब उभारणीचा डाव सत्ताधाऱ्यांनी रचला आहे. अहवाल उशिरा येण्यामागे वैद्यकीय विभागाचा खोडसाळपणा तर नाही ना, अशी चर्चा आता करोना संशयीतांमध्ये सुरू झाली आहे. प्रयोगशाळेची तपासणी क्षमता असतानाही कमी स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सोलापूरहून शहरात आलेले एक उच्चशिक्षित दांपत्य स्वतःहून तपासणीकरिता वायसीएम रुग्णालयात गेले. उन्हात प्रवास करून आल्याने सुरवातील त्यांच्या शरिराचे तापमान जादा आहे. मात्र काही मिनिटांनी त्यांच्या शरिराचे तापमान कमी झाले. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना महापालिकेने मोशी येथील अलगीकरण कक्षात राहण्याचा सल्ला दिला. रविवारी त्यांचा स्वॅब तपासणीकरिता पाठविण्यात आला. मात्र गुरुवारपर्यंत याबाबतचा अहवाल त्यांना प्राप्त झालेला नव्हता. यामुळे आपला अहवाल काय येईल, याची टांगती तलवार यांच्यावर निर्माण झाली. असाच प्रकार इतर रुग्णांच्या बाबतीतही घडत आहे.
महापालिकेचा वैद्यकीय विभाग रुग्णांचे स्वॅब एनआयव्ही आणि भोसरीतील नारी संस्थेकडे तपासणीसाठी पाठवितात. नारी संस्थेची स्वॅब तपासणीची क्षमता 150 इतकी आहे. मात्र महापालिकेकडून अवघे 40 ते 70 स्वॅब तपासणीसाठी पाठवितात, अशी माहिती नारी संस्थेकडून देण्यात आली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्ताधारी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी खासगी लॅब उभारणी करण्याचा घाट घातला आहे. यामुळे तपासणीकरिता कमी स्वॅब पाठवून रुग्णांच्या तपासणी अहवाल जाणीवपूर्वक उशिरा दिला जात असल्याची चर्चा आता शहरात सुरू झाली आहे.
याशिवाय इतर जिल्ह्याच्या ठिकाणी तपासणी लॅब उभारण्यात आल्याने एनआयव्हीकडील तपासणीचा भारही थोड्याफार प्रमाणात कमी झाला आहे. तपासणी अहवाल उशिरा आले आणि रुग्णांची ओरड झाली तर शहरात लॅब उभारणीचा मार्ग आपोआप खुला होईल, अशी आशा सत्ताधारी पक्षाला वाटत आहे.