महाबळेश्वर (प्रतिनिधी) -राज्याच्या इतर भागांपेक्षा महाबळेश्वरकरांना आर्थिक मदतीची अधिक आवश्यकता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत या महिनाअखेरीस बैठक घेऊन महाबळेश्वरकरांना पॅकेज जाहीर करण्याची मागणी करण्याची ग्वाही खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खा. डॉ. शिंदे यांची दरे, ता. महाबळेश्वर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत हेते. महाबळेश्वरकरांच्या व्यथा वेगळ्या आहेत. राज्याच्या इतर भागातील रोजगार हळूहळू सुरू होत आहेत; परंतु महाबळेश्वर येथील पर्यटन व्यवसाय पावसाळ्यात पूर्णपणे बंद असतो. राज्यातील रोजगार सुरू झाले तरी येथील लोकांचे व्यवसाय, रोजगार ऑक्टोबरपर्यंत सुरू होणे कठीण आहे.
महाबळेश्वरकरांसाठी उन्हाळी हंगाम महत्त्वाचा असतो; परंतु कोव्हिड-19 मुळे येथील सर्वसामान्यांचा रोजगार बुडाला आहे. महाबळेश्वर येथील ज्या घटकांना मदतीची गरज आहे, त्यांची माहिती गोळा करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे. ही सर्व माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्यांना या संदर्भात बैठक घेण्याची विनंती करणार आहे, असे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक संजय पिसाळ, विजय भिलारे, शंकर जांभळे, सतीश ओंबळे, असिफ सय्यद, रोहन कोमटी, धीरेन नागपाल, योगेश बावळेकर, अनिल केळगणे, सुनील वाडकर उपस्थित होते.
“त्या’ निधीतील रक्कम पॅकेज म्हणून द्यावी
महाबळेश्वरच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी शंभर कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. त्यातील काही रक्कम महाबळेश्वरकरांच्या पॅकेजसाठी वापरण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार आहे. विकास होत राहील; परंतु आधी माणूस जगविला पाहिजे. तो जगला तरच पर्यटनस्थळ सुरू राहणार आहे, असे खा. शिंदे म्हणाले.