मुंबई – राज्यातील करोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. रुग्णवाढीमध्ये सध्या नागपूर आघाडीवर असलं तरी आता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक कऱण्यात आले आहेत. पुण्यात रात्रीची संचारबंदी आहे. मात्र आता मुंबईचीही वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने असल्याचे दिसत आहे.
मागील आठवड्याभरात मुंबईत करोना प्रादुर्भावामुळे सील करण्यात आलेल्या इमारती आणि मजल्यांच्या संख्येत तब्बल २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही बाब मुंबईकरांसाठी चिंताजनक आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार शहरांत ९ मार्चपर्यंत एकूण २२९ इमारती आणि २,७६२ मजले कोरोनामुळे सील करण्यात आले आहेत. २ मार्चच्या आकडेवारीनुसार यात २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २ मार्च रोजी मुंबईत एकूण १८५ इमारती आणि २,२३७ मजले सील करण्यात आले होते. शहरात आता एकूण सील करण्यात आलेल्या मजल्यांमध्ये ४.५ लाख लोक राहत आहेत. तर सील करण्यात आलेल्या इमारतींमध्ये १.४ लाख लोक राहत आहेत.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार के-पश्चिम विभागात (अंधेरी पश्चिम, विलेपार्ले पश्चिम, जुहू) सर्वाधिक इमारती (एकूण ३४) आणि मजले (एकूण ५१८) सील करण्यात आले आहेत. तर आर-दक्षिण विभागात (कांदीवली, चारकोप) एकूण ३० इमारती आणि एस वॉर्डमध्ये (भांडूप, विक्रोळी, पवई) २८ इमारती सील करण्यात आल्या आहेत.