मुंबई – मुंबई महापालिकेतील विशेष अभियांत्रिकी विभागाचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना करोनाची लागण झाली असल्याचा वैद्यकीय अहवाल आला होता. त्यामुळे करोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. माहीम येथील राहत्या घरी मध्यरात्री शिरीष दीक्षित यांचे निधन झाले. दीक्षित हे सोमवारपर्यंत कामावर हजर होते. सायन रुग्णालयात त्यांचा मृतदेह नेण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण शोधले जात आहे.
पाणीपुरवठा खात्याचे प्रमुख अभियंता असणारे शिरीष दीक्षित यांच्याकडे उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) या पदाची देखील अतिरिक्त जबाबदारी होती. 1987 मध्ये ते “दुय्यम अभियंता’ या पदावर रुजू झाले होते. आपल्या महापालिकेतील सेवा कारकिर्दीदरम्यान पाणीपुरवठा विषयक अनेक महत्त्वाचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. शिरीष दीक्षित यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे.
पाणीपुरवठा प्रकल्पांपैकी, मध्य वैतरणा प्रकल्पांतर्गत असणाऱ्या भांडुप जलाशय, भांडुप जलप्रक्रिया केंद्र, उदंचन केंद्र प्रकल्प यासारखे अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. गुंदवली ते भांडुप संकुलापर्यंतचा तब्बल 15 किलोमीटर लांबीचा जलबोगदा करण्यात आणि गारगाई प्रकल्पाला गती देण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
करोनाच्या अधिक प्रभावी उपचारांसाठी महापालिकेद्वारे वरळी येथील एनएससीआय. येथे उभारण्यात आलेल्या “जम्बो फॅसिलिटी’ आणि “रेस्को’ येथे तयार करण्यात आलेल्या करोना विलगीकरण केंद्रांच्या उभारणीत शिरीष दीक्षित यांचा मोलाचा वाटा होता.