मुंबई – करोनामुळे लॉकडाऊनच्या काळात खासगी रुग्णालये बंद असल्यामुळे सामान्यांना वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचा महिन्याभरात 1403 रुग्णांनी लाभ घेतला आहे. या सेवेसाठी मोबाईल ऍप तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात ते कार्यान्वित झाल्यानंतर या सेवेच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना लाभ घेता येऊ शकेल.
राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मे मध्ये पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते. या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून एखादा रुग्ण राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप यांचा वापर करून कुठल्याही आजारावर सल्ला मसलत करू शकतो.
या सेवेचे मोबाईल ऍप तयार झाल्यावर आवश्यकता भासल्यास डॉक्टरांची संख्या वाढविता येईल आणि विशेषज्ञांच्या सेवांसाठी विशिष्ट वेळ देखील दिली जाईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. सध्या मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महानगरांमधून या ऑनलाईन ओपीडी सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ऑनलाईन प्रक्रियेमुळे सुलभता…
मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी केल्यावर “ओटीपी’ येतो. त्या माध्यमातून रुग्ण नोंदणी अर्ज भरतो. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळखक्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो. लॉगईनसाठी एसएमएसद्वारे नोटिफिकेशन येते.
त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळख क्रमांकाच्या आधारे लॉगईन करता येते. वेटिंग रुमवर एन्टर केल्यानंतर काही वेळातच “कॉल नाऊ’ हे बटन कार्यान्वित (ऍक्टिव्हेट) होते. त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टरांशी चर्चा केली जाते. चर्चेनंतर लगेच ई- प्रिस्क्रिप्शन प्राप्त होते.