मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघाला आहे. मनोज जरांगे पाटील यांची यात्रा आज पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील काही भागातील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. ही पदयात्रा गुरुवारी सकाळी लोणावळा येथून मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरून मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे द्रुतगती महामार्गावरील पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक गुरुवारी सकाळी बंद ठेवण्यात येणार आहे.
मनोज जरांगे यांची पदयात्रा आज चंदननगर खराडी बायपास येथून निघून राष्ट्रीय महामार्ग ४८ ने लोणावळ्याला पोहोचणार आहे. राष्ट्रीय महामार्ग ४८ लगत वाकसाई गाव येथे यात्रा मुक्कामी असणार आहे. तर गुरुवारी सकाळी लोणावळा येथून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून पुढे वाशीला जाणार आहे. त्यामुळे द्रुतगती महामार्गावरून पदयात्रा पुढे जाईपर्यंत गुरुवारी सकाळपासून पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबईकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गे वळवण्यात येणार आहे.
25 आणि 26 जानेवारीला अवजड वाहनांना प्रवेशबंदी
मनोज जरांगे यांची पदयात्रा 25 जानेवारी रोजी नवी मुंबईत दाखल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर 25 जानेवारी रात्री 12 ते 26 जानेवारीला रात्री 11 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र या सूचना अत्यावश्यक सेवांना लागू नसणार आहेत. वाहतूक विभागाकडून याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवार 25 जानेवारी रोजी हा मोर्चा नवी मुंबईत धडकणार आहे. त्यावेळी मराठा आंदोलकांच्या मुक्कामाची सोय ही नवी मुंबईत करण्यात आली आहे.