मुंबई – गुजरातमधील भरूच आणि अंकलेश्वर स्थानकांदरम्यान नर्मदा (Narmada) नदी धोक्याच्या खुणेवरून वाहत असल्याने रविवारी रात्रीपासून मुंबई-अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad train) मार्गावरील रेल्वे वाहतूक सुमारे 11 तासांसाठी थांबवण्यात आली असे पश्चिम रेल्वेने सांगितले.
मुंबई-अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad) मार्गावरील वडोदरा विभागातील भरूच आणि अंकलेश्वर स्थानकांदरम्यान नर्मदा नदीच्या वाढत्या पाण्यामुळे रविवारी रात्रीपासून ही वाहतूक थांबवण्यात आली.
सध्या नदीच्या पाण्याची पातळी कमी होण्यास सुरुवात झाली असली तरी ती अजूनही धोक्याच्या खुणेच्यावर असल्याने ही रेल्वे वाहतूक अजून पुर्ववत करण्यात आली नसल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नदीच्या दोन्ही टोकांवरील सर्व प्रवासी आणि मालगाड्या थांबवण्यात आल्या आहेत. गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना अल्पोपाहार, चहा आणि पाणी देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आमच्या अंदाजानुसार, पाण्याची पातळी काही तासांनंतर धोक्याच्या चिन्हाच्या खाली येऊ शकते, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या बाबत प्रवाशांना माहिती देण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
पुरामुळे मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस आणि शताब्दी एक्स्प्रेससह किमान दीड डझन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, असे पश्चिम रेल्वेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
रविवारी गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली, सखल भागात पूर आला आणि नर्मदा आणि इतर नद्या पूर्ण भरून वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.