मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याने देशात एकच गोंधळ निर्माण झाला होता. गाडीत स्फोटकांसह धमकीचे पत्र असून यामध्ये अंबानींच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान, आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आला आहे.
अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे सोपविण्यात आला होता. आता धमकीचा देखील तपास एटीएसकडे देण्यात आला आहे. मनसुख हिरेन यांनी जबाबात म्हटलं आहे की, घरगुती वापराकरता ती मी गाडी विकत घेतली. त्याचे स्टेअरिंग जॅम झालं, त्यानंतर ते क्रॉफर्ड मार्केटला जाऊन भेटले. कोणाला भेटले? सचिन वाझे आणि त्यांचे टेलिफोन संवाद होते. जो या प्रकरणातला दुवा होता, त्याची बॉडी सापडली आहे.
मी मृतदेह पाहिला, हात मागे बांधले आहेत असं कोणी आत्महत्या करत नाही. इतके योगायोग होत नाहीत. तात्काळ हे प्रकरण एनआयएकडे दिलं पाहिजे, असं यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच गृहमंत्री यांच्या बोलण्यात आणि पोलीस जबाबात तफावत असल्याचं सांगत कोणी पोहोचायच्या आत सचिन वाझे कसे पोहोचले? क्रॉफर्ड मार्केटला भेटलेला व्यक्ती कोण? असे प्रश्न उपस्थित केले.
फडणवीस यांनी या प्रकरणात एनआयए चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने शिफारस करावी अशी मागणी विधानसभेत केली होती. या प्रकरणाचा तपास करण्यास महाराष्ट्र पोलीस यंत्रणा सक्षम आहे त्यामुळे हा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या ‘एटीएस’कडून करण्यात येईल. तसेच या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले होते.