मुंबई – येत्या रविवारी (ता.14) रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा आयोगाने करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यी संतप्त झाले आहेत. पुण्यातील नवी पेठ येथे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत रास्ता रोको केला. तसेच सरकार विरोधी घोषणाबाजी केली. त्यानंतर आता आयोगाच्या निर्णयावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
“राजकीय पक्षांच्या रॅली चालू आहेत. आंदोलने चालू आहेत. आम्ही सगळेच पक्ष आपापले कार्यक्रम करत आहोत. सत्तापक्षाच्या ट्रॅक्टर रॅली होत असतात. परीक्षेमध्ये तर सोशल डिस्टन्सिंग पाळले जात असते. सरकारने दिलेले करोनाचं कारण अतिशय तकलादू आहे. त्यामुळे या कारणामुळे परीक्षा रद्द करणे अतिशय चुकीचे होईल. मराठा विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या परीक्षा घेऊन त्या विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल. पण आज या परीक्षा तत्काळ घ्यायला हव्यात.”
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
“राज्यात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्याचा मंत्री जरी असलो तरी कष्टकरी, कामगार, मध्यमवर्गीय यांची मुले मोठ्या प्रमाणात परीक्षा देत असल्याने त्यांचे आई-वडील घाम गाळून मुलांना अधिकारी होण्याचे स्वप्न बघत आहे. त्यामुळे मी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विनंती करून यावर तोडगा काढून मार्ग काढावा, विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्या, तसेच विरोधी पक्षांनी यावर तेल घालून राजकारण करू नये, आपल्या सर्वांच्या मुलांच्या भविष्याचा विषय आहे, यावर सर्वजण मिळून तोडगा काढूया.”
– विजय वेडेट्टीवार, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री
“परीक्षेबाबत अनिश्चितता तयार करणे योग्य नसून, सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा. अचानक परीक्षा पुढे ढकलणे योग्य नाही.”
– पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेस नेते
“विद्यार्थ्यांच्या परीक्षा या झाल्याच पाहिजेत. तसेच पोलिसांनी आंदोलकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आहे. हे कदापी आम्ही खपवून घेणार नाही. जोपर्यंत परीक्षा तुम्ही पुन्हा घेत नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता सोडणार नाही.”
– गोपीचंद पडळकर, भाजप नेते
“एमपीएससीची परीक्षा ढकलण्याचा निर्णय चुकीचा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत #MPSC रविवार दिनांक 14 मार्च, 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 ही अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. हा चुकीचा निर्णय घेतला गेला आहे. यामुळे परीक्षार्थींचे नुकसान होणार असल्याने त्याला नापसंती व्यक्त करत आहे.”
– पंकजा मुंडे, भाजप नेत्या