नवी दिल्ली : छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलेल्या विधानांवरून नवा वाद निर्माण झाला आहे.त्यांनी महिलांवरील काही अत्याचाराच्या घटनांविषयी वक्तव्य केले आहे. “बहुतांश मुली सुरुवातीला स्वतःहून संबंध ठेवतात आणि काही काळानंतर ब्रेकअप झाल्यानंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात,” असे विधान अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केले आहे.त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
छत्तीसगढमधील बिलासपूरमध्ये माध्यमांशी बोलत असताना अध्यक्षा किरणमयी नायक हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी ,”जर एखादी विवाहित व्यक्ती एखाद्या मुलीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत असेल, तर अशावेळी मुलींनी हे बघायला हवं की ती व्यक्ती त्यांना जगण्यासाठी मदत करणार आहे की नाही. पण, जेव्हा असे संबंध तुटतात तेव्हा बहुतांश घटनांमध्ये महिला पोलीस ठाण्यात धाव घेतात,” असे नायक म्हणाल्या.
“अल्पवयीन असणाऱ्या मुलींना माझा सल्ला आहे की, कोणत्याही फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात फसू नका. तुमचं कुटुंब, मित्र आणि तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. हल्ली १८ व्या वर्षीच लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. पुढे काही वर्षानंतर जेव्हा मुलं होतात, तेव्हा दाम्पत्याला सोबत राहणं अवघड होत आहे,” असेदेखील नायक म्हणाल्या. “बहुतांश घटना अशा आहेत की लिव्ह इनमध्ये राहून सहमतीने संबंध ठेवल्यानंतरही मुली बलात्काराच्या तक्रारी दाखल करतात. मी महिला/मुलींना आवाहन करते की, त्यांनी आधी नातं समजून घ्यावं. जर तुम्ही अशा प्रकारच्या नातेसंबंधांमध्ये आहात, त्याचा परिणाम वाईटच होईल,” असा सल्ला त्यांनी दिला.
“सहमतीने संबंध ठेवल्यानंतर जर नातं तुटल्यानंतरच्या बहुतांश घटना आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप संपते तेव्हा बलात्काराचे गुन्हे दाखल केले जातात. जास्तीत जास्त कौटुंबिक वाद सोडण्याचे आयोगाचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच आम्ही महिला व पुरूषांना त्यांच्या चुकांवरून समज देत असतो. त्यांनी मार्ग काढावा यासाठी प्रयत्न करतो. समुपदेशन हाच मार्ग आहे,”असेही नायक म्हणाल्या.