कोलकाता/नवी दिल्ली – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वाहनाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकारमध्ये असणारा तणाव विकोपाला गेला आहे. तर यातच आता टीएमसीच्या नेत्याने भाजपावर गंभीर आरोप केला आहे. जर येती विधानसभा निवडणूक भाजपा जिंकली नाही तर गुप्तपणे लोकांना पाठवून ममता बॅनर्जी यांची हत्या करू शकते, असा आरोप मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर गुरूवारी कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली होती. त्यात विजय वर्गीय यांच्या वाहनांच्या काचा फुटल्या होत्या. हा हल्ला तृणमूल कॉंग्रेसने घडवल्याचा आरोप भाजपाने केला होता. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपण केंद्र सरकारला राज्यातील कायदा व्यवस्थेच्या स्थितीचा अहवाल आपण पाठवला आहे, अशी माहिती राज्यपाल जगदीप धनकड यांनी दिली.
या हल्ल्यानंतर भाजप आणि तृणमूलमध्ये शाब्दिक युध्द रंगले आहे. बंगाल हे तृणमूलच्या राजवटीत जुलूम, अत्याचार आणि काळोखलेले राज्य बनले आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. तृणमूलच्या राजवटीत प. बंगालमध्ये उफाळलेला राजकीय हिंसाचार वाईट आणि काळजी करण्याजोगा असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या प्रकरणात तीन एफआयआर नोंद झाल्या आहेत. तर आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.