ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण घटले, परंतु मृत्यू वाढले
पिंपरी – करोनाचा संसर्ग वाढत असल्याने उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शहरात 14 जुलैपासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. परंतु याच लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक रुग्णवाढ आणि मृत्यू झाले होते. जुलै महिन्याच्या अखेरीस करोनाचा उद्रेक वाढतच राहिला. परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. परंतु मृत्यूचे प्रमाण मात्र वाढत राहिले. जुलै महिन्यात करोनामुळे तीनशेहून अधिक मृत्यू झाले होते. तर ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात 124 रुग्णांचा करोनाने बळी घेतला.
शहरात पहिला करोनाचा रुग्ण 11 मार्च रोजी आढळला होता. 11 मार्च पासून ते 1 जुलैपर्यंत एकूण 77 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर 2 जुलैपासून 31 जुलैपर्यंत 363 रुग्णांचा मृत्यू झाला. 31 जुलै सायंकाळपर्यंत शहरातील 335 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 86 अशा एकूण 421 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. एक ऑगस्टपासून दैनंदिन रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. जुलैच्या अखेरीस रोज एक हजाराहून अधिक रुग्ण आढळत होते. ते ऑगस्टमध्ये काहीसे कमी झाले. परंतु याच काळात मृत्यूंचा आकडा मात्र वाढत होता.
करोनाचा वाढता संसर्ग पाहता पिंपरी-चिंचवड शहरात 14 जुलैपासून कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. परंतु या “लॉकडाऊन’च्या दहा दिवसांत 5900हून अधिक नवीन रुग्ण आढळून आले तर 149 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
मृत्यूच्या बाबतीत लॉकडाऊनच्या खालोखाल ऑगस्टचा पहिला आठवडा घातक ठरला. 6 ऑगस्ट रोजीच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण 545 इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी शहरातील 444 इतक्या तर शहराबाहेरील 101 इतक्या रुग्णांचा करोनामुळे बळी गेला होता. सहा ऑगस्ट रोजी पुन्हा नव्या बाधितांचा आकडा एक हजारांच्या पुढे गेला आहे. यामुळे करोनाबाबतची शहराची स्थिती अद्यापही चिंताजनक आहे.