पुणे – अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार यंदा पावसाने विदर्भ सीमेद्वारे महाराष्ट्रात पाऊल टाकले आहे. भौगोलिक परिस्थिती आणि घटनांनुसार महाराष्ट्रात दाखल होणारा पाऊस साधारणपणे तळकोकण-किनारपट्टी प्रदेश-मुंबई-पश्चिम महाराष्ट्र-मध्य महाराष्ट्र-मराठवाडा आणि विदर्भ अशी मजल-दरमजल करत राज्य व्यापतो. पण, यंदा “बिपरजॉय’ वादळामुळे सुरुवातीपासूनच मोसमी वाऱ्यांच्या प्रवाहाला बरेच अडथळे आले. त्यामुळे भौगोलिक स्थिती बदलून तेलंगणा आणि छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेशचा काही भाग व्यापत मान्सूनने विदर्भमार्गे राज्यात एन्ट्री केली आहे.
ही घटना पाहता, सन 2014, 2019 मध्येही असेच काहीसे घडले होते. तर, आता 2023 मध्येही पुन्हा मान्सून विदर्भमार्गे आला आहे. या तिन्ही घटनांमध्ये साम्य म्हणजे, 2014 मध्ये “नानूक’ या वादळामुळे मान्सूनच्या प्रवासात खंड पडला होता. त्यावेळी दि. 7 जुलैनंतर राज्यात पाऊस सक्रिय झाला होता. नंतर राज्यातील बहुतांश भागांमध्ये खंडित पाऊस झाल्याची नोंद आहे. तर, सन 2019 मध्ये निर्माण झालेल्या “वायू’ या चक्रीवादळामुळे मान्सूनची सुरुवात नेहमीपेक्षा सुमारे एक आठवडा उशिरा झाली. पण, नंतर मात्र काही भौगोलिक स्थितींमुळे पाऊस चांगला झाला.
वर्ष आणि महत्त्वाची निरीक्षणे
सन 2014 : मोसमी पावसावर प्रतिकूल परिणाम करणारी “एल निनो’ परिस्थिती निर्माण झाली. त्यावर्षी देशभरात 668 मि.मी. पाऊस झाला. जवळपास 20 मोठ्या राज्यांमध्ये पावसाने दडी मारली. ही तूट सुमारे 31 टक्के होती. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली.
सन 2019 : पावसाचा प्रवास उशिरा सुरू झाला, तरी दुसऱ्या टप्प्यात देशभरात समाधानकारक वृष्टी झाली. वादळामुळे ढगांच्या पुढील प्रवासाला मदत झाली. या वर्षात देशभरात सुमारे 838.2 मि.मी. पावसाची नोंद झाली. हे प्रमाण सामान्यपेक्षा दहा टक्के अधिक राहिले.
सन 2023 : यंदा “एल निनो’ परिस्थिती असून, वादळामुळे पावसाचा पुढील प्रवास लांबला आहे. आता मान्सून सक्रिय झाला असला, तरी त्यात तूट राहण्याचा अंदाज आहे. हिंद महासागरातील “आयओडी’ परिस्थिती पॉझिटिव्ह असून, हवामान विभाग चांगल्या पावसाबद्दल आशावादी आहे.