पुणे – शहरात हुडहुडी भरणाऱ्या थंडीने पुणे गारठले असून, आज हंगामातील निच्चांकी 9.7 तर एनडीए परिसरात 8.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस थंडीचा जोर कायम राहणार असून, दाट धुके तर दुपारीही हवेत गारवा असेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
मागील आठवड्यापासून शहर आणि जिल्ह्यातील किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीचा जोर वाढत होता. मात्र, गेल्या 24 तासात गारठा वाढला असून, यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमनाची नोंद झाली. एनडीए परिसरात सर्वात कमी 8.2 तर हवेली परिसरात 8.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर शहराच्या मध्यवर्ती भागातही 10 अंशाच्या पुढे असलेले किमान तापमान 9.7 अंशापर्यंत खाली आले आहे.
हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले की, उत्तरेकडे वार्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. हवामानातील अनुकूल बदलांमुळे पुण्यातील तापमानात लक्षणीय घट नोंदविण्यात आली. पुढील दोन दिवस आकाश निरभ्र आणि गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बुधवारी रात्रीपासूनच हवेतील गारठा वाढला होता. बोचऱ्या वार्यांमुळे मध्यरात्री थंडी वाढली.
सकाळी लवकर फिरायला, व्यायामाला गेलेल्या नागरिकांना नेहमीपेक्षा जास्त थंडी असल्याने हुडहुडी भरत आहे. शाळेत निघालेली मुले स्वेटर, मफलर अशी तयारी करून बाहेर पडली होती. पुण्याच्या मध्यवर्ती भागाच्या तुलनेत उपनगरात थंडीचा कडाका जास्त जाणवत आहे. जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी किमान तापमान बारा अंशापेक्षा कमीच नोंदवले गेले.
पुण्याच्या विविध भागातील किमान तापमान
एनडीए ८.२, माळीण ८.२, हवेली परिसर ८.७, शिवाजीनगर ९.७, राजगुरुनगर ९.७, बारामती ९.८, निमगिरी ९.९, पाषाण १०.१, इंदापूर १०.५, लवासा १०.८, दौंड १०.९, पुरंदर ११, तळेगाव ढमढेरे ११.१, भोर १२.४, डुडुळगाव १२.४, लोहगाव १२.७, शिरुर १२.८, नारायणगाव १२.९, आंबेगाव १४.९, चिंचवड १५.५, लवळे १६.६, मगरपट्टा १६.८ आणि वडगावशेरीत १७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात नाशिकमध्ये नीचांकी तापमानाची नोंद
राज्यात नाशिकमध्ये नीचांक ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर त्या खालोखाल अहमदनगर ९.३, जळगाव ९.९, मालेगाव १०, वाशिम १०.२, बवलढाणा ११, महाबळेश्वर ११.४, अकोला १२, अमरावती १२.१, यवतमाळ १२.२, गोंदीया १३.५, वर्धा १४, कोल्हापूर १४.२, नागपूर १४.६, धाराशिव १५, सांताक्रूझ १५.२ आणि रत्नागिरीत १६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.