आज बाबांनी सहजच रेडिओ लावला आणि काय गंमत, अचानक बाहेर पाऊस रिमझिमायला सुरुवात झाली… ऊन्हातच. ऊन पावसाचा खेळ सुरू झाला जणू आणि रेडिओवरसुद्धा पावसाचंच गाणं सुरू झालं. सुंदर योगायोगच. “हसरा नाचरा, जरासा लाजरा, श्रावण आला… श्रावण आला’. पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या सुरेल आवाजातलं हे गाणं सर्वांना खूपच आवडलं. गाणं संपल्याबरोबर बाळू बाबांना म्हणाला, “काय भारी आहे ना हे गाणं बाबा?’ बाबा म्हणाले, “अरे, गाणं लिहिलंय कोणी? भारी तर असणारच.’ बाबांनी कवीचं नाव गुलदस्त्याच ठेवल्यावर शमीने सरळ विचारलं, “कोणी लिहिलंय बाबा हे गाणं?’ बाबांऐवजी बाळूच पटकन म्हणाला, “अगं ये वेडूबाई, कविवर्य कुसुमाग्रजांनी लिहिलंय हे गाणं. त्यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर.’ शमी म्हणाली, “म्हणजे कुसुमाग्रज या टोपणनावाने ते कविता लिहायचे ना?’ बाळूने होकारार्थी मान हलवली.
बाबांना वाटलं, छान संधी चालून आलीय. आज मुलांशी कवी आणि कवितेवरच गप्पा माराव्यात. त्यांनी रेडिओ बंद केला आणि शमीला म्हणाले, “अगं शमू, आपल्या मराठी भाषेत असे खूप कवी टोपणनावाने कविता लिहायचे. आरतीप्रभू या टोपणनावाने चिं. त्र्यं. खनोलकर कविता लिहायचे. “येरे घना येरे घना, न्हाऊ घाल माझ्या मना’, हे त्यांचं अजरामर गाणं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं, आशा भोसले यांनी अतिशय सुंदर गायलंय.’ बाळू म्हणाला, “बाबा बालकवींची ती श्रावणाची कविताही मला खूप आवडते. “श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी उन पडे’. किती छान आहे नाही?’ शमी पटकन म्हणाली, “मला आठवलं बरं बालकवीचं पूर्ण नाव, त्रिंबक बापूजी ठोंबरे. बरोबर ना?’ बाबा म्हणाले, “अगदी बरोबर! “बी’ नावाचे कवी माहीत आहे का तुम्हाला? “गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या, का गं गंगा यमुनाही या मिळाल्या, उभय पितरांच्या चित्तचोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला’ तसेच “चाफा बोलना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना’, ही त्यांची गाणी अप्रतिमच.
केशवकुमार म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे बरं का! त्यांचं “आजीचं घड्याळ’ कविता तर आजही लहानथोरांची खूप आवडती आहे.’ शमी म्हणाली, “बाबा कोणती हो?’ “अगं, “आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देई ठेवुनि तें कुठे अजुनि नाही कुणास ठाऊक, त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते… किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते’. शमी म्हणाली, “अरे व्वा. किल्ली न देता चालणारं आजीचं घड्याळ मस्तच की.’ बाळूला काहीतरी आठवलं, तो पटकन म्हणाला, “बाबा केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ना, त्यांची “तुतारी’ कविताही केवढी भारीय हो.
“एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकिन मी जी स्वप्राणाने, भेदुनि टाकिन सगळी गगनें, दीर्घ जिच्या त्या किंकाळीने’. कवितेचा हा सुरेल संवाद ऐकता ऐकता मध्येच आई म्हणाली, “अरे मुलांनो, “मना सज्जना भक्ति पंथेचि जावें, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे । जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें, जनीं वंद्य तें सर्व भावें करावें ।। हा श्लोक कुणाचा माहितीय?’ शमी म्हणाली, “अगं आई, हा श्लोक तर समर्थ रामदास स्वामींचा. त्यांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर.’ एकूण दोनशे पाच आहेत हे श्रीमनाचे श्लोक. मनाला वळण लावणारे.’ बाबा म्हणाले, “मुलांनो, आत्माराव रावजी देशपांडे हे कवी “अनिल’ या नावाने तर माणिक गोडघाटे हे कवी “ग्रेस’ या नावाने कविता लिहायचे.
खरंतर, आज रेडिओवरील श्रावणगीतामुळे घरातल्या गप्पांतही कवितांचा पाऊस छानपैकी बरसला होता. तेवढ्यात बाळूने कवितेला सुरुवात केली-
थेंबाथेबांने बरसे, आसमंत सारा
भुरळ घालितो, हा मृदगंधी वारा
साजिरा गोजिरा, आला श्रीरंग श्रावण
आकाशी बांधितो, इंद्रधनूचे तोरण
जागे होई रान, येई अलगद खुलून
ऋतू हिरवा भेटतो, पिसारा फुलवून
श्रावण गुज सांगे, कसे बहरून यावे
दान हे सौख्याचे, कसे बरसून द्यावे
असा हा श्रावण, सृष्टीचे गीत गातो
पानोपानी, मनोमनी, चैतन्य फुलवितो
आई म्हणाली, “व्वा… व्वा! आजच्या श्रावणगप्पांना बाळूच्या कवितेने वेगळाच रंग चढवला. “श्रावणसरी जणू आल्या आमुच्या घरी’. शमी लगेच म्हणाली, “आई भारी हा. तुही झालीस की कवयित्री. बाळूदा तुझं एखादं टोपणनाव लाव ना तुझ्या कवितेसाठी.’ बाळू म्हणाला, भारीय आयडिया, पण कोणतं टोपणनाव घेऊ मी?’ शमी तत्परतेनं म्हणाली, “अरे, “श्रावण’ हे नाव घे. सदाबहार आहे ते. अगदी तुझ्यासारखंच, काय हो आईबाबा खरंय ना?’ आईबाबांनी मान हलवून होकार भरला आणि बाहेर श्रावणसरीही मोठ्याने बरसून शमीच्या बोलण्याला दुजोरा देत होत्या.
बाळू आनंदला. हसून मोठ्याने म्हणाला, “श्रावण… मी आहे श्रावण.’
यावर सर्वांचेच इंद्रधनुष्यी हास्य घरभर पसरले. बाहेर पावसाचं रिमझिम गाणं सुरूच होतं.
– एकनाथ आव्हाड