नवी दिल्ली – एबीजी शिपयार्ड कंपनीचा गुजरातमधील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा 22 हजार 842 कोटी रूपयांचा घोटाळा उघडकीला आला असून हा घोटाळा थेट मोदींच्याच आर्शिवादाने झाला असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी हा आरोप करताना म्हटले आहे की, मोदींच्या सात वर्षांच्या कार्यकाळात देशात तब्बल 5 लाख 35 हजार कोटी रूपयांचे बॅंक घोटाळे झाले आहेत. गेल्या सात वर्षात बड्या उद्योगपतींची 8 लाख 17 हजार कोटी रूपयांची बॅंक कर्जे माफ केली गेली आहेत. गेल्या 7 वर्षात देशातील बॅंकांच्या बुडित कर्जाची रक्कम 21 लाख कोटी रूपयांनी वाढली आहे असे दावेही त्यांनी केले.
देशवासियांची बॅंकेत ठेवलेली रक्कम लुटा आणि विदेशात पळून जा हीच खरी मोदी सरकारची फ्लॅगशिप योजना आहे. गुजरात मधील एबीजी शिपयार्ड कंपनीने तब्बल 22 बॅंकांना 22 हजार 842 कोटी रूपयांचा चुना लावला आहे. गेल्या 75 वर्षातला हा सर्वात मोठा बॅंक घोटाळा आहे. हा घोटाळा झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी संबंधीतांवर गुन्हा दाखल झाला आहे असा आरोपही त्यांनी केला.
यातील आरोपींना पळून जाण्यास मुदत मिळावी म्हणूनच यात गुन्हा दाखल करण्यास व प्रत्यक्ष कारवाई करण्यास विलंब झाला आहे असा आरोप सुर्जेवाला यांनी केला. देशातल्या अन्य मोठ्या कर्ज बुडवणाऱ्या उद्योगपतींच्या बाबतीतही हाच हतखंडा प्रयोग झाला आहे असे ते म्हणाले.
नीरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या, चेतन संदेसरा यांच्या मालिकेत आता श्रृषि आगरवाल, संथनम मुथुस्वामी, अश्विनी आगरवाल ही नावे समाविष्ट झाली आहेत असे त्यांनी नमूद केले. 1 ऑगस्ट 2017 रोजीच श्रृषि आगरवालच्या विरोधात तक्रार आली होती. त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाईची मागणी कॉंग्रेसने 2018 रोजी केली होती अशी माहितीही सुर्जेवालांनी दिली.
आरोपींशी मोदींचे थेट संबंध !
सुर्जेवाला यांनी असा आरोप केला की एबीजी बॅंक घोटाळा प्रकरणात स्टेट बॅंकेने सीबीआयला 8 नोव्हेंबर 2019 रोजी गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. पण त्यावेळी सीबीआयने कोणताही गुन्हा नोंदवला नाही किंवा कारवाई केली नाही. त्यामुळे 25 ऑगस्ट 2020 मध्ये स्टेट बॅंकेने पुन्हा सीबीआयला हा गुन्हा नोंदवण्याची सुचना केली होती. त्यानंतरही सीबीआयने कोणतीही कारवाई केली नाही. आरोपींना पुर्ण मुदत मिळावी म्हणूनच हे गुन्हा नोंदवण्याचे काम लांबवण्यात आले.
त्यानंतर प्रत्यक्षात 7 फेब्रुवारी 2022 रोजी हा गुन्हा नोंदवला गेला आहे असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. एबीजी बॅंक घोटाळ्याचा सूत्रधारही मोदींचाच समर्थक आहे असा दावाही त्यांनी केला. 2007 मध्ये मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या कंपनीला 1 लाख 21 हजार चौरस मिटरची जमीन कवडीमोल भावाने दिली होती. त्यानंतरही मोदी सरकारने त्यांच्यावर अनेकवेळा मेहरबानी केली असल्याची उदाहरणे सुर्जेवाला यांनी दिली. एवढेच नव्हे तर मोदींनी कोरियात जाताना श्रृषि आगरवाल यांना आपल्या सोबत नेले होते अशी माहितीही त्यांनी दिली.