नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने कितीही ही यात्रा यशस्वी झाल्याचे ढोल वाजवले तरी वास्तव एकच आहे की अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मोदींच्या या दौऱ्यात चीनबाबत चकार शब्द काढलेला नाही. चीनने भारताचा 4026 किमीचा भूभाग बेकायदा बळकावला असूनही मोदी यांच्यासमोर अमेरिकेने चीनच्या विरोधात अवाक्षरही काढले नाही याकडे स्वामी यांनी लक्ष वेधले आहे.
सरकारने मोदींचा दौरा यशस्वी झाल्याचा कितीही प्रचार केला तरी मोदी अमेरिकेतून रिकाम्या हातांनीच परतत आहेत असेही स्वामी यांनी म्हटले आहे. दरम्यान, त्यांच्या या विधानावरून सोशल मीडियावर मात्र तिव्र पडसाद उमटले असून काही जणांनी स्वामी यांना लक्ष्य केले आहे. मोदी यांनी चीनशी टेबलावर बसून चर्चा करायची की त्या देशासोबत लढाई सुरू करायची असे स्वामी यांना विचारले आहे. त्यालाही स्वामी यांनी उत्तर दिले आहे.
झाशीच्या राणीसारखे लढा, किंवा राणी चेनम्मा यांच्यासारखा लढा द्या किंवा राणी पद्मिनीप्रमाणे आत्महत्या करा. मात्र ज्या देशाने तुमच्या जमीनीवर कब्जा केला आहे त्याच्याशी तडजोड करू नका. असे झाले तर स्वत: इश्वरही तुमच्यासाठी मैदानात उतरेल. मात्र मोदी यांच्याकडे पाहुन असे वाटते आहे की त्यांनी अगोदरच शरणागती पत्करली आहे अशी टिप्पणही स्वामी यांनी केली आहे.
चीनसोबत कधी आक्रमक धोरण किंवा कधी चर्चा अशी रणनीती सरकारकडून अवलंबली जाते आहे. ती स्वामी यांना मान्य नसून ते यावरूनच सरकारला सातत्याने लक्ष करताना दिसत आहेत.