नवी दिल्ली – दिल्ली अध्यादेशासारखा मुद्दा विरोधकांच्या बैठकीत टाळायला हवा. त्या मुद्द्यावर नंतर चहा-बिस्कीटं घेऊन तोडगा काढा, असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कॉंग्रेस आणि आपला केले. पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीत कॉंग्रेसने अध्यादेशाच्या मुद्द्यावरून आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा आपने व्यक्त केली.
एवढेच नव्हे तर, कॉंग्रेसने पाठिंब्याची हमी न दिल्यास बैठकीतून बाहेर पडण्याचा इशाराही दिला. त्या पार्श्वभूमीवर, कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठकीत बोलताना दिल्ली अध्यादेशाच्या मुद्द्यावर नंतर भूमिका जाहीर करण्याची ग्वाही दिली. घटनाबाह्य बाबीला कॉंग्रेसचे समर्थन मिळणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
त्यातून कॉंग्रेसने आपला अप्रत्यक्ष पाठिंबाच दर्शवला असल्याची भावना इतर पक्षांच्या नेत्यांची बनली. त्यांनी कॉंग्रेसची बाजू घेत त्या पक्षाची भूमिका रास्त असल्याचे मान्य केले. त्यानंतरही दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी स्वत:च्या पक्षाची भूमिका लावून धरली. आपला पाठिंबा देण्याची ग्वाही कॉंग्रेसने बैठकीच्या अखेरीस द्यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
केजरीवाल यांच्या आग्रही आणि काहीशा आक्रमक भूमिकेमुळे चर्चा वेगळीकडेच जाण्याच्या शक्यतेने ममतांनी हस्तक्षेप केला. चहापानासाठी एकत्र येऊन मतभेदांवर तोडगा काढला जाऊ शकतो, अशा आशयाची समंजस भूमिका ममतांनी मांडली. ऐक्यासाठी सर्वांनाच मन मोठे करावे लागणार असल्याची सहमती बहुतांश विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये झाली.