सातारा – लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार व सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदारही भाजपचाच असेल, असा ठाम विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी साताऱ्यात व्यक्त केला. सदाशिव पेठेतील सराफ व्यावसायिक चंद्रशेखर घोडके यांच्या निवासस्थानासमोरील चौकात पक्षाची “संपर्क से समर्थन’ या अभियानाच्या निमित्ताने छोटी सभा झाली. यावेळी बावनकुळे बोलत होते. मोती चौक ते शनिवार चौक दरम्यान “घर चलो’ अभियानांतर्गत
बाजारपेठेत पदयात्रा काढून व्यापारी, नागरिकांशी बावनकुळे यांनी संवाद साधला.बावनकुळे म्हणाले, “”कॉंग्रेसचे नेते सातत्याने भाजप जनतेची दिशाभूल करतोय अशी टीका करत आहेत. मात्र, ते स्वतःच गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.” त्यामुळे कॉंग्रेस म्हणजे रक्ताचा कॅन्सर असून देशाला ग्रासणाऱ्या कॉंग्रेसला जनतेने हद्दपार करावे, असे आवाहन त्यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची ताकद कळेल आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील.
सातारकरांनी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला आरक्षणाच्या निर्णयामुळे लोकसभेत 191 महिला खासदार होतील. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीमध्येही भाजपची ताकद सातारा विधानसभा मतदारसंघात प्रचंड आहे, तेथे शिवेंद्रसिंहराजे यांना राज्यातील सर्वाधिक मताधिक्य द्या, असे आवाहन त्यांनी केले.
कंदी पेढ्यांच्या हाराने सन्मान
जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, सुनील काटकर, अतुल भोसले, रंजना रावत, स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, गीतांजली कदम, विकास गोसावी, धनंजय जांभळे यांच्या उपस्थितीत मोती चौकात क्रेनद्वारे भव्य हार घालून बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट केला. मोती चौकातून पदयात्रेला सुरुवात झाली. येथील मोदी व लाटकर या पेढे व्यवसायिकांशी बावनकुळे यांनी संवाद साधला. तेथे त्यांना कंदी पेढ्यांचा हार घालून सन्मानित करण्यात आले. गुलाबाची पुष्पवृष्टी आणि ढोल ताशांचा गजर, जयघोष करणारे भाजपचे कार्यकर्ते अशा वातावरणात पदयात्रा पार पडली. व्यापारी, व्यावसायिक, सराफ दुकानदार, भांड्याचे व्यापारी आदींशी बावनकुळे यांनी संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली.