मुंबई – देशावर आलेल्या कोरोना संकटानंतर मुंबईची ओळख देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेलं शहर अशी झाली. मात्र आजवर अनेक संकटांना निधड्या छातीनं सामोरं जाणारी मुंबई कोरोनाविरोधातील लढाईत देखील बाजी मारताना दिसतीये.
दरम्यान, मुंबईतील या कोरोनाविरोधातील लढ्याबाबत केंद्र सरकारने मुंबई महापालिका व राज्यातील ठाकरे सरकारची पाठ थोपटली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला होता. मात्र आता मुंबई महापालिका व राज्य सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे येथील परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचं दिसतंय.
याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने महापालिका व ठाकरे सरकारचे कौतुक करताना, “धारावीत ८० टक्के लोक सार्वजनिक शौचलायाचा वापर करतात. एका घरात जवळपास आठ ते दहा लोक राहतात. याखेरीज छोट्या गल्ल्या, दोन ते तीन मजल्यांची घरं, अनेक ठिकाणी तळ मजल्यांवर फॅक्टरी अशी परिस्थिती आहे. येथे सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नसून होम क्वांरटाइनचीही मोठी समस्या आहे. असं असलं तरी राज्य सरकारने ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग हा मंत्र वापरला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली”.
रुग्णसंख्या घटली; डबलिंग रेटमध्ये सुधारणा
अत्यंत दाटीवाटी असलेल्या धारावीत कोरोनाचे ४९१ रुग्ण होते तर डबलिंग रेट १८ दिवसांचा होता. परंतु सरकारी यंत्रणेने वेळीच योग्य पावलं उचलल्याने मे महिन्यात डबलिंग रेट ४३ दिवसांवर आला. जूनमध्ये तो ७८ दिवस एवढा आहे.