नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या मदतीच्या योजना आणि करोना व्हायरसवर मदतीचे अमिष दाखऊन आगामी काळात भारतीय नागरिक व उद्योगांवर सायबर हल्ले वाढण्याची शक्यता आहे. सायबर हल्ल्यावर देखरेख ठेवण्यासाठी सरकारने नियुक्त केलेल्या सीईआरटी- इन या संस्थेने सावधगिरीच्या सूचना जारी केल्या आहेत.
हे हल्ले 21 जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. सरकारी वेबसाईटप्रमाणे स्पेलिंग असलेल्या या बनावट हल्लेखोराकडून नागरिकांची आणि उद्योगांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे एखादी मेल उघडण्यापूर्वी मेल पाठविणाऱ्याच्या अधिकृततेची खात्री करावी असे आवाहन करण्यात आले आहे. असे ई-मेल उघडल्यानंतर नागरिकांची आणि उद्योगांची माहिती पळविण्याचा धोका आहे असे सीईआरटी- इनने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
हल्लेखोर सरकारी मदत देण्याची भाषा करू शकतात. ती मेल उघडल्यानंतर बॅंका संदर्भातील माहिती मागू शकतात. त्यानंतर या माहितीचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. या हल्लेखोरांकडे 20 लाख इतक्या नागरिकांचे आणि उद्योगांचे ईमेल आयडी आहेत. सरकारी मदतीशिवाय करोनाची चाचणी घेण्यासंदर्भात अशी मेल असू शकते. ncov2019gov.in अशा प्रकारच्या सरकारी वाटणाऱ्या पत्त्यावरून मेल आलेला असू शकतो.
अशा प्रकारच्या अनाहूत मेल उघडण्याचा प्रयत्न करु नये. त्याचबरोबर अशा मेलच्या युआरएलवर क्लिक करू नये. जरी मेल अधिकृत वाटत असली तरी मूळ वेबसाईटवर जाऊन माहिती घ्यावी. हल्लेखोर लॉटरी किंवा बक्षिसाचे आमिष दाखवतात. त्यांना आपली माहिती देऊ नये असे या संस्थेने म्हटले आहे.