प्रशासनाचा विचार : पिंपरीत आणखी एक रुग्ण आढळला
पुणे – जपानला जाऊन आलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील आणखी एकाला करोनाचा संसर्ग झाला असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून करोना रुग्णांची संख्या 16 झाली आहे. आतापर्यंत आढळलेले रुग्ण हे परदेशातून आलेले होते. मात्र, यातील पाच रुग्णांनी परदेशात प्रवास केलेला नाही.
परदेश प्रवास केलेल्या नागरिकांच्या संपर्कात आल्याने पाच रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. ही प्रशासनासमोर चिंतेची बाब आहे. प्रशासनाने आवाहन करूनही गर्दी होत आहे. जे परदेशी सहली करून आलेले आहेत. त्यातील काही लोक प्रशासनाने घरी थांबण्याच्या व योग्य ती खबरदारी घेण्याच्या दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहे. यापार्श्वभूमीवर कोरोनाच्या विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन आता कठोर पाऊले उचलणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील काही भागात जमावबंदी लागू करण्याचा विचार सुरू असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
परदेशात प्रवास न करताही या प्रवाशांच्या संपर्कात आल्याने करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ही काळजी करण्याची बाब असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी नमूद केले. 16 रुग्णांपैकी 10 रुग्णांनी परदेशात प्रवास केलेला आहे. तर एक रुग्ण हा कॅब चालक आहे. तर नव्याने आढलेले चार रुग्ण हे परदेशात जाऊन आलेल्या प्रवासाच्या कुटुंबीयातील आहे. नविन आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात कोण कोण आले आहे, याची माहिती प्रशासन गोळा करत आहे. ज्या नागरिकांना घरीच थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी घरीच थांबावे, घरातून बाहेर पडू नये, अशी विनंती देखील डॉ. म्हैसेकर यांनी केली आहे.
अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी ज्या -ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांनी करोना प्रसार टाळण्यासाठी जे- जे करणे आवश्यक आहे. ती कार्यवाही करण्याचे सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार दोन्ही शहरातील काही भागांमध्ये जमावबंदीचे कलम 144 लागू करण्याचा विचार जिल्हा प्रशासन करत आहे. प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे व आदेशांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले.
…तर खपवून घेणार नाही
ज्या नागरिकांना घरी थांबण्याचा सल्ला दिला आहे. ते लोक बाहेर फिरतात. यामुळे इतरांना संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना जबरदस्तीने विलगीकरण कक्षात नेण्यात येईल. विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याची बाब खपवून घेणार नसल्याचा इशारा विभागीय आयुक्तांनी दिला आहे.