मुंबई – अनाधिकृत मासे विक्रेत्यांचा प्रश्न घेऊन राज ठाकरे यांच्या दरबारी पोहचलेल्या कोळी भगिनींना दिलासा मिळाला आहे. या महिलांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोमवारी भेट घेत, “राजसाहेब बेकायदा मासे विक्रेत्यांना हटवा, परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने आमच्या पोटावर पाय येतो आहे. आमचा व्यवसाय मंदावला आहे तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता” असं गाऱ्हाणं मांडलं होत.
हा प्रश्न आता सोडवण्यात आल्याचा दावा मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर केला आहे.
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक ट्विट करण्यात आलं असून याद्वारे, “स्थानिक मनसे विभागाध्यक्ष संजय नाईक ह्यांनी २४ तासात त्या बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना मनसेदणका दिला व कोळी भगिनींची समस्या सोडवली.” असा दावा करण्यात आला आहे.
‘राजसाहेब, अनधिकृत मासेविक्रेत्यांपासून आम्हाला त्रास होतोय. त्यांचा बंदोबस्त करा’, कृष्णकुंजवर येऊन कोळी भगिनींनी राजसाहेबांकडे मदत मागितली आणि स्थानिक मनसे विभागाध्यक्ष संजय नाईक ह्यांनी २४ तासात त्या बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना #मनसेदणका दिला. #आपलीमुंबई https://t.co/856h02igNo pic.twitter.com/tVdL5FT7jl
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 6, 2020
तत्पूर्वी, या महिला राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी आल्या होत्या. त्यांनी बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा अशी मागणी केली. राज ठाकरेंनी त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं. कोळी महिलांचा प्रश्न आता सोडवण्यात आल्याने राज ठाकरेंनी आपलं आश्वासन २४ तासांमध्ये पूर्ण केले आहे.