पिंपरी -स्वत:च्या स्वार्थासाठी शिवसेनेतून बाहेर पडलेले आणि शिंदे गटात सहभागी झालेले आमदार हे अलीबाबा आणि त्यांचे चाळीस चोर असून यांच्यामुळे महाराष्ट्रात विकासाच्या गतीपासून दूर गेला आहे. या आमदारांना जनताच धडा शिकवेल, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वर्पे यांनी केला.
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने “निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा’ या मेळाव्याचे आयोजन अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. त्यावेळी रविकांत वर्पे बोलत होते. पुढे बोलताना वर्पे म्हणाले, करोनाकाळात अजित पवार यांनी केलेल्या उत्तम कामामुळेच राज्याला करोनाच्या लाटेतून बाहेर काढण्यात यश आले.
आरोग्य विभागाला 9 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देतानाच आमदार निधीही 2 कोटी रुपयांहून 5 कोटी रुपये केला. ज्यावेळी केंद्र शासनाने खासदार निधी देणे बंद केले होते, त्यावेळी अजितदादांनी आमदार निधी वाढवून देत करोना काळातील कामांना गती दिली.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वर्पे यांचा जोरदार हल्लाबोल भाजपकडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने न केलेल्या कामांचे श्रेयही लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. पिंपरी ते निगडी मेट्रोसाठी 940 कोटी रुपये उपलब्ध करून देतानाच पुणे मेट्रोसाठीही अजित पवार यांनी 11 हजार 440 कोटी दिल्यानेच हा प्रकल्प मार्गी लागल्याचा दावा वर्पे यांनी केला. अजित पवार हे उत्तम प्रशासक असल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा नावलौकिक देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर गेला. येत्या महापालिका निवडणुकीत 100 हून अधिक नगरसेवकांना विजयी करत महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागा,
भाजपचे आमदार कोठे होते?
करोना कालावधीत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात 150 हून अधिक बैठका घेतल्या त्यावेळी भाजपचे आमदार कोठे होते? असा प्रश्न यावेळी वर्पे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भोसरीचे आमदार महेश लांडगे हे कधीच या बैठकांकडे फिरकले नाहीत. तरीही अजित पवार यांनी भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकांना करोना काळात निधी कमी पडू दिला नाही.