पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना शहराचा सर्वांगीण विकास करण्यात आपल्याला यश आले. मात्र विरोधकांनी गत निवडणुकीमध्ये पक्षाची बदनामी केल्यामुळे सत्ताबदल झाला. सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम केल्याचा घणाघात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने “निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा’ या मेळाव्याचे आयोजन अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वर्पे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, भाऊसाहेब भोईर, माजी महापौर संजोग वाघेरे, मंगला कदम, अपर्णा डोके, वैशाली घोडेकर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे,
राजू मिसाळ, माजी नगरसेवक शाम लांडे, पंकज भालेकर, राहुल भोसले, विनोद नढे, जगदीश शेट्टी, मयूर कलाटे, समीर मासुळकर, विनायक रणसुंभे, प्रसाद शेट्टी, प्रशांत शितोळे, सतीश दरेकर, विक्रांत लांडे, शमीम पठाण, नारायण बहिरवाडे, डब्बू आसवाणी, प्रभाकर वाघेरे, जालिंदर शिंदे, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, सुमन पवळे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, यश साने, विशाल वाकडकर, फजल शेख, ज्ञानेश्वर कांबळे यांच्यासह पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवार म्हणाले, गतवेळी झालेल्या महापालिका निवडणुकीत विरोधकांनी विकासकामांऐवजी राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे काम केले. जनतेनेही त्यांना संधी दिली. मात्र, गेल्या पाच वर्षातील त्यांच्या कारभाराला लोकही कंटाळले आहेत. महापालिका निवडणुका कधीही झाल्या तरी आपण तयार असले पाहिजे.
भाजपवर टीका करताना पवार म्हणाले, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केलेल्या कामांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. 2017 पूर्वी आम्ही बनविलेल्या रस्त्यांवर कधीही कोंडी होत नव्हती. मात्र भाजपच्या सत्ताधाऱ्यांना केवळ भ्रष्टाचार करावयाचा असल्याने फूटपाथ चुकीच्या पद्धतीने बनविले जात आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
शहराला विकसित करण्याचे काम फक्त आणि फक्त राष्ट्रवादीच्याच माध्यामातून होवू शकते हा विश्वास प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कामाला लागले पाहिजे. कष्ट आणि संघर्षाची तयारी ठेवा, विजय आपलाच आहे, यावेळी शंभर प्लसचा नारा आपल्याला यशस्वी करावयाचा असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.
सत्ता राष्ट्रवादीचीच, महापौर आपलाच – अजित गव्हाणे
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत अक्षरश: अंधाधुंद कारभार करून भ्रष्टाचाराचा कळस केला आहे. या कारभाराला जनता विटली असून शहराचा वेगवान विकास राष्ट्रवादीच्याच माध्यमातून होऊ शकतो ही खात्री आता मतदारांनाही पटल्याने येत्या महापालिका निवडणुकीत पालिकेवर राष्ट्रवादीचीच सत्ता येईल आणि आपलाच महापौर होईल, असा विश्वास अजित गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, निवडणुका कधीही होऊ द्या, प्रभाग चारचा होऊ अथवा तीनचा निवडणुकीत विजय आपलाच असणार आहे. यावेळी भाऊसाहेब भोईर, कविताताई आल्हाट, रविकांत वर्पे, विनायक रणसुंभे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.