अमरावती- गेल्या काही दिवसांपासून अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पेटला आहे. आमदार रवी राणांच्या कार्यकर्त्यांनी पुतळा बसवल्यानंतर पालिकेने तो हटवला. त्यानंतर राणांच्या कार्यकर्त्यांनी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोणाबाजी केली.
आता पुन्हा तोच पुतळा आणि तोच वाद चर्चेत आला आहे. रात्री पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होता तो कट्टा मनपाने तोडला आहे. त्यानंतर आक्रमक झालेल्या आमदार रवी राणा यांनी अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्याबद्दल वादग्रस्त व अपमानास्पद टीका केली, आयुक्त आष्टीकर यांना अक्कल नाही, वेडपट आहेत, त्यांनी जरा समजदारीन वागले पाहिजे अशी टीका राणा यांनी केली.
त्यामुळे हा वाद पुन्हा वाढला आहे. गेल्यावेळीही याच पुतळ्याच्या वादावरून जोरदार आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी राणांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.या पुतळ्यावरून गेल्या आंदोलनातही खासदार नवनीत राणा उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होत्या. आज त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
हा कट्टा हटवला तो सूड बुद्धीने हटवला आहे, यावरून राजकारण सुरू आहे, येत्या 19 फेब्रुवारीला तिथे पुन्हा पुतळा बसवला जाणार आहे असेही रवी राणा म्हणाले आहेत, शिवसेना सरकार असताना आम्हाला पुतळा उभारायला हा त्रास होतोय, बाळासाहेब ठाकरे असते तर कुणी बोट दाखवले नसते, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.