पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी पुणे महापालिकेकडून मुंबईच्या धर्तीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र आणि पूर्णवेळ कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. या कक्षात नियुक्त कर्मचाऱ्यांना तसे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी ही माहिती दिली.
आयुक्त भोसले यांनी मंगळवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कामाचा आढावा घेतला. तसेच पावसाळापूर्वी कामांची माहिती घेतली. या बैठकीस सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. दरम्यान, मागील वर्षी शहरात सुमारे १७१ ठिकाणी पावसाने पाणी साचले होते. या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून गेल्या वर्षभरात कामे केली असून, या कामांची पाहणी बुधवारपासून आयुक्त स्वत: करणार आहेत. हडपसर परिसरात ही पाहणी केली जाणार आहे.
मनपातर्फे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षासह पावसाळी कामांच्या नियोजनासाठी आवश्यक कर्मचारी क्षेत्रीय कार्यालय तसेच पथ विभाग, ड्रेनेज विभाग, पथ विभाग, मलनि:सारण विभागाकडून नेमले जातात. त्यासाठी, खासगी ठेकेदारांची मदत घेतली जाते. मात्र, आता मुंबई धर्तीवर कायमस्वरूपी कर्मचारी नेमण्याचे नियोजन आहे. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रत्येकी तीन वर्षांसाठी असेल. नियुक्तीपूर्वीच त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाईल.
अग्निशमन दलाची मदत घेणार
शहरात अग्निशमन दलाचे पंधरा केंद्र आहेत. तसेच महालिकेच्या ४७ रुग्णवाहिका आहेत. आपत्कालिन परिस्थितीत केवळ अग्निशमन दलच कार्यरत राहता कामा नये. त्यांना इतर विभागांनी मदत करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचा इतर विभागांशी समन्वय ठेवला जाणार आहे.
आजच्या बैठकीत आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. मात्र, पुणे महापालिका केवळ पावसाळ्यातच हा कक्ष कार्यान्वित करते. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर तो कायमस्वरूपी ठेवण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी, पालिकेचे पथक लवकरच मुंबई महापालिकेच्या कक्षाचा अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे. – राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका