बारामती -करोनाच्या काळात राज्य सरकारकडे 1 लाख कोटी, तर मुंबई महानगर पालिकेजवळ 63 हजार कोटींच्या ठेवी पडून आहेत. केवळ ताळमेळ नसल्याने वंचित घटक अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे राज्य सरकार सर्वच घटकांमध्ये अपयशी ठरले आहेत. तसेच कॉमन मिनिमम प्रोग्रॅम मधूनच सरकार अद्याप बाहेर आले नसल्याचा घणाघात आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर व विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्यावर गोपीचंद पडळकर प्रथमच बारामतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बारामती येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, पांडुरंग कचरे, सतीश फाळके, उपस्थित होते.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाशिक तसेच कोकणात दौरे केले. त्या भागातील जनतेला देखील मदत मिळाली नाही. धनगर आरक्षण प्रश्नावर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल तसेच मेंढपाळांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कायद्या करणे गरजेचे आहे. याबाबत पाठपुरावा करणार आहे. धनगर समाजाच्या उन्नतीसाठी एक हजार कोटींची तरतूद भाजप सरकारच्या काळात करण्यात आली होती. महाविकास आघाडीचे सरकार करणे त्याकडे दुर्लक्ष केले आहे. मेंढपाळांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दहा दिवस दौरा करणार असून मेंढपाळांच्या पालावर मुक्काम ठोकणार आहे.
विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पक्षाच्या आदेशाने मी निवडणूक लढविली. माझा पराभव झाला डिपॉझिट जप्त झाले. पक्षाने त्यावेळी ठेवलेल्या विश्वासास पात्र ठरलो नाही. असे असले तरीदेखील बारामती विधानसभा मतदारसंघात नियमित संपर्क ठेवणार आहे. पंधरा दिवसातून एकदा बारामतीचा दौरा करणार आहे. पराभवाने खचून न जाता आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवार विजयी करण्यासाठी काम करणार आहे. बारामतीतील ज्या विषयांची चर्चा सभागृहात केले जात नाही, असे विषय सभागृहात चर्चेसाठी मांडणार असल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले.