वाल्हे – शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले होते. मात्र दीड महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये दुधाच्या दरात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे व्यावसायिक आर्थिक अडचणीत आहेत. शेतीमालासह बाजारभाव मिळत नसल्याने अगोदरच चिंतेत असलेल्या शेतकऱ्याला जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायात दुधाचा खप नसल्याने बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
लॉकडाऊनमध्ये दुधाला खासगी दूध संस्था व दूध डेअरीचालक 20 ते 24 रुपये प्रतिलिटर इतका नीचांकी भाव देत आहेत. या रकमेतून मूलभूत खर्चही भागविणे शेतकऱ्यांना जिकरीचे झाले आहे. वाल्हे परिसरामध्ये पावसामुळे ज्वारीचे मोठे नुकसान झाल्याने यावर्षीही कडब्याचा बाजारभाव शेकडा 2 हजार 500 रुपयांपासून ते शेकडा 4 हजार 500 रुपयांपर्यंत जाऊन पोहचला. पाऊस जास्तकाळ सुरू राहिल्याने हिरवा चारा अतिवृष्टीमुळे शेतामध्येच कुजून गेला.
दिवाळीनंतर साखर कारखाने सुरू झाल्यावर उसाचे वाढे 500 रूपये शेकडा मिळत होते. आत्ता ऊस तोडणी बंद झाल्याने हिरवा चारा उपलब्ध नसल्याने गोठ्यामध्ये गाय असूनही दुधाचे बाजारभाव, हिरव्या चाऱ्यांची कमतरता, आदी कारणांमुळे शेतकरी दूध व्यवसायाला बगल देण्याच्या मानसिकेत पोहोचला आहे.
पशूखाद्यांचा भाव वधारला
लॉकडाऊन होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या दुधाला साधारण 30 ते 35 रुपये बाजारभाव मिळत होता. मात्र, ग्राहकांना आजही पूर्वीच्याच दरानुसार दूध दिले जात आहे. त्यातच शेंगदाणा पेंड अडीच हजार रुपये, सुग्रास नंदन (60 किलो) 1345 रूपये, हिदुस्थान- 1365 रुपये, रत्ना 50 किलो- 1255, भुसा- 1200 रुपये, सरकी पेंड 2 हजार रुपयांच्या पुढे आहे. पशुखाद्याचे वाढते भाव शेतकऱ्यांना घायकुतीला आणत आहेत. दुधाचे बाजारभाव जरी कमी झाले असले तरी, पशुखाद्याचे बाजारभाव मात्र, तेजीत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात रुतला आहे. यावर शासनाने तातडीने योग्य उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.